आपण निरोगी राहावं यासाठी अनेक गोष्टींची काळजी घेतो. त्यात पोटासाठी अन्न जितके महत्त्वाचे असते, त्यापेक्षाही डोळ्यांसाठी झोप अधिक महत्त्वाची असते. मात्र, आजच्या जगात लोक अशा एका महत्त्वाच्या गरजेकडे दुर्लक्ष करतात, जे त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
उशिरा झोपणे आणि फक्त ५-६ तास झोप घेणे ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. पण, झोपेच्या वेळी, आपला मेंदू दिवसातील टाकाऊ गोष्टी साफ करतो आणि स्मरणशक्ती, शिकण्याची प्रक्रिया व भावनांना पुन्हा ताजेतवाने करतो, तसेच शरीरातील भूक, चयापचय आणि तणावाशी संबंधित हार्मोन्सचे नियमन करतो. मात्र, जेव्हा झोप अपुरी असते, तेव्हा शरीराचा समतोल बिघडू लागतो, ज्यामुळे दिवसा थकवा, एकाग्रतेचा अभाव, चिडचिड आणि विचार करण्याची गती मंदावते. झोपेच्या कमतरतेचा परिणाम हृदय, रक्तदाब आणि रोगप्रतिकारशक्तीवरही होतो. दीर्घकाळ झोप न मिळाल्यास उच्च रक्तदाब, मधुमेह आणि वाढलेला तणाव यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
मानवी शरीर घड्याळाप्रमाणे काम करते आणि झोपेची वेळ झाल्यावर संकेत देते. शरीराचा समतोल राखण्यासाठी आणि दुसऱ्या दिवसाची तयारी करण्यासाठी ७-८ तासांची झोप महत्त्वाची भूमिका बजावते. पण, जेव्हा झोप अपुरी असते, तेव्हा मेंदूला थकवा जाणवतो, ज्यामुळे दैनंदिन कामे करणे कठीण होते. यामुळे मनःस्थितीत बदल आणि डोकेदुखी होऊ शकते. याचा शरीराच्या तणाव आणि हार्मोन्स हाताळण्याच्या क्षमतेवरही थेट परिणाम होतो. त्यामुळे नियमित झोप घेण्याचा सल्ला दिला जातो.


