महाराष्ट्र जागरण: शरीर सुदृढ राहण्यासाठी त्याला अनेक अन्नघटकांची आवश्यकता असते. हे अन्नघटक पुरेशा प्रमाणात शरीरात गेल्यास शरीराचे कार्य सुरळीत चालण्यास मदत होते, अन्यथा ठरावीक काळाने आपल्याला विविध तक्रारींचा सामना करावा लागतो. रोजच्या आहारात सहज समावेश करू शकू असे हे घटक आवर्जून खायला हवेत. अनेकदा धावपळीत आपले आहाराकडे दुर्लक्ष होते. आवडी-निवडी असल्याने ठरावीकच गोष्टी खाणे, डब्यातले अन्न टाकून देणे, जिभेला चविष्ट लागत असल्याने बाहेरचे पदार्थ जास्त खाल्ल्याने शरीरावर विपरीत परिणाम होतात. त्यामुळे शरीराला कोणते घटक आवश्यक असतात, त्यांचे शरीराच्या कार्यात असणारे महत्त्व आणि ते खाल्ले नाहीत तर कोणत्या तक्रारी उद्भवतात याविषयी…
कॅल्शियम:
शेंगदाणे, तीळ, दूध, खोबरं, ज्वारी, राजगिरा यामध्ये कॅल्शियम असते. त्यामुळे यातील पदार्थ आवर्जून आहारात घ्यावेत. याबरोबरच खरबूज, खजूर आणि मुळा, कोबी या भाज्यांमध्येही कॅल्शियम पुरेशा प्रमाणात असते. कॅल्शियम हे शरीरातील सर्वात मुख्य खनिज असून ते हाडांच्या बळकटीसाठी आणि शरीराच्या पोषणासाठी आवश्यक असते. हे घटक आहारात घेत नसाल तर त्यामुळे हृदयरोग, ऑस्टियोपोरोसिस, दंतरोग, केस गळणे यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. सुरुवातीला गंभीर न वाटणाऱ्या या समस्या कालांतराने गंभीर होऊ शकतात.
लोह:
महिलांमध्ये साधारणतः लोहाची कमतरता असल्याने त्यांना विविध तक्रारींचा सामना करावा लागतो. मात्र असे होऊ नये यासाठी लहानपणापासूनच खजूर, अंजीर, मनुका, सफरचंद, डाळिंब, पालक, सीताफळ, ऊस, बोरे, मध, पपई आणि मेथी यांचा आहारात समावेश करावा. शरीराची योग्य पद्धतीने वाढ व्हावी यासाठी हा घटक अत्यावश्यक असतो. लोहाची कमतरता झाल्यास शरीरात रक्ताची कमतरता भासते. त्यामुळे अशक्तपणा, कावीळ किंवा पोटात मुरडा येतो.
आयोडिन:
हा शरीरातील एक आवश्यक घटक आहे. केवळ मीठातच आयोडिन असते, असा आपला समज असतो. मात्र शिंगाडा, काकडी, कोबी, राजगिरा, शतावरी, मीठ आणि लसूण या पदार्थांमध्ये आयोडिन असते. शरीरात उत्पन्न होणाऱ्या पदार्थापासून मेंदूचा बचाव करण्याचे काम आयोडिनद्वारे केले जाते. याची कमतरता असलेल्यांना थायरॉइडची समस्या, केस गळणे, नैराश्य असे त्रास उद्भवू शकतात.
मॅग्नेशियम:
बाजरी, बीट, खजूर, सोयाबीन, दूध, लिची, कारलं या पदार्थामध्ये पुरेशा प्रमाणात मॅग्नेशियम असते. मात्र त्याची कमतरता असेल तर उदास होणे, आळस येणे, ताण येणे, झोप न लागणे, बेचैनी, सोरायसिस, फोड येणे, नपुंसकता किंवा वांझपणा अशा तक्रारी उद्भवतात. मॅग्नेशियममुळे पेशीचं कार्य सुधारतं आणि ते शरीरातील रेचक म्हणून काम करते.


