Bharat Bandh : केंद्र सरकारच्या विविध धोरणांविरोधात आवाज उठवण्यासाठी बुधवार, 12 फेब्रुवारी 2026 रोजी देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. संयुक्त किसान मोर्चा (SKM) आणि देशातील प्रमुख कामगार संघटनांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या ‘भारत बंद’मुळे रस्ते वाहतुकीपासून ते बँकिंग व्यवहारांपर्यंत सर्वच महत्त्वाच्या सेवांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. या देशव्यापी आंदोलनामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची चिन्हे असून प्रशासनानेही खबरदारीचे उपाय योजले आहेत.
संपाचे मुख्य कारण: नवीन ‘लेबर कोड’ आणि खाजगीकरणाला विरोध
कामगार संघटनांनी केंद्र सरकारच्या नव्या चार कामगार संहितांविरुद्ध (Labor Codes) तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हे नवे कायदे कामगारांची नोकरीची सुरक्षा धोक्यात आणणारे असून, यामुळे भांडवलदारांचे वर्चस्व वाढेल, असा आरोप संघटनांनी केला आहे. यासोबतच सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांचे खाजगीकरण थांबवणे, वीज दुरुस्ती विधेयक आणि ‘पीस’ (PEACE) कायदा रद्द करणे, अशा प्रमुख मागण्यांसाठी हा लढा पुकारण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी देखील बियाणे विधेयकाचा मसुदा मागे घेण्याची आणि मनरेगा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी लावून धरली आहे.
बँकिंग सेवांवर संपाचे सावट; एटीएम व्यवहारांवर येऊ शकतो ताण
ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA) या संपात सक्रिय सहभागी असल्याने सरकारी बँकांमधील कामकाज पूर्णपणे ठप्प राहू शकते. SBI आणि IDBI सारख्या मोठ्या बँकांनी आपल्या ग्राहकांना संभाव्य त्रासाबाबत आधीच सतर्क केले आहे. संपाच्या काळात चेक क्लिअरन्स, डिमांड ड्राफ्ट बनवणे आणि थेट खिडकीवरील रोख व्यवहारांवर मर्यादा येऊ शकतात. जरी नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग आणि एटीएम सेवा तांत्रिकदृष्ट्या सुरू राहणार असल्या, तरी एटीएममधील रोकड लवकर संपण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शाळा, महाविद्यालये आणि बाजारपेठांची अनिश्चितता
शिक्षण संस्थांबाबत केंद्र सरकारने अधिकृत सुट्टी जाहीर केली नसली तरी, स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेतले जाणार आहेत. केरळ आणि कर्नाटकात बंदचा प्रभाव अधिक राहण्याची शक्यता असल्याने तिथे शाळा बंद राहू शकतात. महाराष्ट्रातही ‘चक्का जाम’ आंदोलनामुळे बस आणि रिक्षा वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो. अनेक शहरांतील व्यापारी संघटनांनी प्रतिकात्मक बंद पुकारला असल्याने दुकाने आणि बाजारपेठा बंद राहण्याची चिन्हे आहेत. पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळांकडून येणाऱ्या अधिकृत सूचनांकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अत्यावश्यक सेवांना संपातून सवलत
सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आपत्कालीन सेवांना या संपातून पूर्णपणे वगळण्यात आले आहे. रुग्णालय, मेडिकल स्टोअर्स, रुग्णवाहिका आणि दूध पुरवठा यांसारख्या अत्यावश्यक सेवा सुरळीत सुरू राहतील. रेल्वे आणि विमाने त्यांच्या नियोजित वेळापत्रकानुसार चालतील, परंतु रस्ते वाहतूक विस्कळीत झाल्यास स्थानकांपर्यंत किंवा विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागेल.


