Cloudburst In Barshi: बार्शी तालुक्यात झालेल्या ढगफुटीमुळे अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून नद्यांना आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. भोगावती, नागझरी, नीलकंठा आणि चांदणी नद्यांना आलेल्या पुरामुळे अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे. वैराग, आगळगाव, मळेगाव, कांदलगाव, श्रीपत पिंपरी, दहिटणे, पिंपळवाडी आणि मांजरे देवगाव या भागातील शेतात पाणी शिरल्याने उभी पिके पाण्यात गेली आहेत.
कासारवाडी येथे बळीराजा हॉटेल पाण्यात बुडाले असून पिंपळगाव पानमधील नीलकंठा नदीला आलेल्या महापुरामुळे दत्त मंदिर परिसरासह वस्त्यांमध्ये पाणी घुसले आहे. तसेच स्थानिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, कांदलगाव येथे चांदणी नदीचे पाणी ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद शाळेत शिरले.
याशिवाय, देवगाव भागात घरांमध्ये पाणी शिरल्याने संसारोपयोगी वस्तू वाहून गेल्या आहेत. आगळगाव येथील नदीला पूर आल्यामुळे बार्शी-आगळगाव वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच बार्शी-तुळजापूर रस्त्यावरच्या ओढ्यांना पूर आल्याने मार्ग बंद करण्यात आला आहे. कव्हे-मोहोळ रोडवरील घोरवढा भागात मोठ्या प्रमाणात पाणी वाहिल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे.
तथापी, आगळगावजवळील कळंबवाडी (आ) भागातही मुसळधार पावसामुळे शेतातील माती वाहून गेल्याने शेतकऱ्यांना फटका बसला आहे. सुर्डी मंदिर परिसरात पाण्याचा प्रवाह वाढल्याने सुर्डी-रस्तापूर रस्त्यावरून प्रवास करू नये, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार दिलीप सोपल आणि माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी बांधावर भेट दिली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.


