Baramati Bypoll: राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम टप्प्यात अत्यंत नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी महायुतीचे मोठे शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी अजित पवार गटाने निकराचे प्रयत्न केले होते, मात्र काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी दिल्याने आता बारामतीत प्रत्यक्ष रणसंग्राम रंगणार हे स्पष्ट झाले आहे.
भावूक सुनेत्रा पवार आणि ‘बारामतीची माउली’
अर्ज भरण्यापूर्वी आयोजित महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात भावनिक वातावरण पाहायला मिळाले. भाषणादरम्यान दिवंगत नेते अजित पवार यांच्या आठवणीने सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर झाले. “दादांसाठी बारामतीचा प्रत्येक माणूस पांडुरंग होता आणि त्यांनी आयुष्यभर या विठ्ठलाची सेवा केली,” अशा शब्दांत त्यांनी मतदारांना साद घातली. याच सभेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा गौरव ‘बारामतीची माउली’ असा केला, ज्यामुळे उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.
‘लोकशाहीत विरोध होणारच’; शरद पवारांची भूमिका
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या निवडणुकीबाबत आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. नवी दिल्लीतून माध्यमांशी बोलताना त्यांनी नमूद केले की, “काँग्रेस हा एक स्वायत्त आणि मोठा राजकीय पक्ष असून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे.” बिनविरोधच्या चर्चेवर भाष्य करताना ते म्हणाले की, “लोकशाहीच्या मैदानात कोणीतरी विरोधात असणारच, हे समजूनच आपल्याला पुढे जावे लागते. त्यामुळे आता ही निवडणूक बिनविरोध होणार नाही, यावर अधिक चर्चा करण्यात अर्थ नाही.”
55 उमेदवारांचा अर्ज आणि राजकीय पेच
सुनेत्रा पवार यांच्या विरोधात एकूण 55 उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने बारामतीची ही पोटनिवडणूक तांत्रिक आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत गुंतागुंतीची ठरणार आहे. काँग्रेसच्या एन्ट्रीमुळे आता येथील लढत केवळ औपचारिक न राहता अधिक चुरशीची होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महायुतीचे शक्तीप्रदर्शन आणि काँग्रेसचे आव्हान यामुळे बारामतीचा निकाल कोणाच्या बाजूने लागणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.


