Ramnagar Bus Accident: जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्याच्या रामनगर-काघोट भागात आज एक हृदयद्रावक रस्ते अपघात घडला. रामनगरहून उधमपूरच्या दिशेने जाणाऱ्या एका प्रवासी बसचा अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार, या अपघाताची तीव्रता इतकी भीषण आहे की, यामध्ये १५ हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
युद्धपातळीवर बचावकार्य
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस आणि बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली आहेत. सध्या युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य सुरू असून, ढिगाऱ्याखाली किंवा बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच, ज्यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे, त्यांना उपचारांसाठी हवाई मार्गाने (एअरलिफ्ट करून) मोठ्या रुग्णालयात हलवण्याची तातडीची व्यवस्था प्रशासनाकडून केली जात आहे.
केंद्रीय मंत्र्यांकडून घटनेची दखल
या दुर्घटनेची गंभीर दखल घेत केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी तत्काळ परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) या प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत माहिती दिली की, त्यांनी उधमपूरचे जिल्हाधिकारी (DC) मिंगा शेरपा यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “काघोट गावात बस अपघात झाल्याची माहिती मिळताच बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. जखमींना सर्वोत्तम उपचार मिळवून देण्याचे निर्देश देण्यात आले असून, मी स्थानिक प्रशासनाच्या आणि राजेंद्र शर्मा यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांच्या पथकाच्या सतत संपर्कात आहे.” अद्याप प्रशासनाकडून मृतांच्या आकड्याबाबत किंवा अपघाताच्या नेमक्या कारणाबाबत कोणतेही अधिकृत सविस्तर निवेदन जारी करण्यात आलेले नाही.


