मुंबई: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत विरोधी पक्षांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मनसेप्रमुख राज ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तसेच इतर विरोधी पक्षांचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत १ नोव्हेंबर रोजी होणारा मोर्चा आणि बोगस मतदार याद्यांवरील गोंधळ या विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
‘मतदार यादीतील घोळ दूर करा, अन्यथा निवडणुका नाही’
बैठकीत सर्व विरोधी पक्ष एकवटले आणि ठाम भूमिका घेतली की, ‘जोपर्यंत राज्य निवडणूक आयोगाने बोगस आणि दुबार मतदार यादीतून वगळले नाहीत, तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत.’ विरोधकांनी स्पष्ट इशारा दिला की, मतदार यादीतील गोंधळ दुरुस्त झाल्याशिवाय निवडणुकांना विरोध सुरूच राहील. आयोगाने टप्प्याटप्प्याने कार्यक्रम जाहीर केला असला तरी, निवडणुका पारदर्शक झाल्याशिवाय जनतेच्या विश्वासाला तडा जाईल, अशी चिंता विरोधकांनी व्यक्त केली.
१ नोव्हेंबरला ‘सत्याचा मोर्चा’
शिवसेना नेते अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, १ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता फॅशन स्ट्रीटवरून मोर्चा सुरू होईल, आणि मेट्रो सिनेमा मार्गे महापालिका मुख्यालयापर्यंत जाणार आहे. परब म्हणाले, हा मोर्चा सत्य जनतेसमोर आणण्यासाठी आहे. मतदार याद्यांतील अन्याय आणि मतचोरीविरोधात आम्ही लढत आहोत. मोर्चानंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. तथापी, शरद पवार मोर्चात सहभागी होणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.
हेही वाचा – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हिव्हिपॅट नाहीच; निवडणूक आयोगाने स्पष्टच सांगितलं
सत्ताधाऱ्यांविरुद्ध संयुक्त रणनिती
बैठकीदरम्यान उद्धव ठाकरे, राज ठाकरे, जितेंद्र आव्हाड, सचिन सावंत, नितीन सरदेसाई, जयंत पाटील आणि इतर नेत्यांमध्ये पुढील रणनीतीवर चर्चा झाली. १ नोव्हेंबरच्या मोर्चानंतर सर्व पक्ष एकत्र येऊन पुढील टप्प्याचे आंदोलन जाहीर करणार आहेत. दरम्यान, भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी विरोधकांच्या मोर्चावर टीका करताना म्हटले, हा मोर्चा म्हणजे सत्तेसाठी व्याकूळ झालेल्यांचा प्रयत्न आहे. फॅशन स्ट्रीटवरून सुरू होणारा हा मोर्चा म्हणजे राजकीय फेरीवाल्यांचा जमाव आहे. ‘इथे बस, तिथे बस’ असं राजकारण सुरू आहे, अशा शब्दांत दरेकर यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.


