Balpudi MIDC: इंदापूर तालुक्यातील बळपुडी एम.आय.डी.सी. परिसरातील कंपन्यांच्या मनमानी कारभारामुळे आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे सध्या स्थानिक ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. “Y Axis Steel Structure Pvt. Ltd.” (जिंदाल) आणि “Great Well Engineering” या दोन कंपन्यांविरोधात कामगार शोषण, संशयास्पद मृत्यू आणि वाढते जलप्रदूषण यांसारखे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांनी आता थेट संघर्षाची भूमिका घेतली आहे.
तक्रारींची दखल नाही; मुख्यमंत्री कार्यालयाचे निर्देशही धाब्यावर
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन ७ मार्च २०२६ रोजी विविध सरकारी विभागांकडे रीतसर तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. त्यानंतर ९ मार्च रोजी मुख्यमंत्री कार्यालयाकडून संबंधित यंत्रणांना कारवाईचे स्पष्ट निर्देशही देण्यात आले होते. मात्र, इतके दिवस उलटूनही प्रत्यक्ष जमिनीवर कोणतीही कारवाई न झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. प्रशासकीय दिरंगाईमुळे कंपन्यांचे धाडस वाढत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे.
कामगार शोषण आणि सुरक्षेचा अभाव
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कंपन्यांमध्ये कामगार कायद्यांचे सर्रास उल्लंघन होत आहे. कामगारांकडून दररोज १२ ते १६ तास काम करून घेतले जात असून, अनेक कामगारांची अधिकृत नोंदणीही केलेली नाही. विशेष म्हणजे, या ठिकाणी अल्पवयीन कामगार धोक्याच्या परिस्थितीत काम करत असल्याचा धक्कादायक आरोपही करण्यात आला आहे. सुरक्षिततेच्या अभावामुळे कामगारांच्या जीवाशी खेळ सुरू असून, अलीकडच्या काळात झालेल्या मृत्यूच्या प्रकारांमुळे भीतीचे वातावरण आहे.
जलप्रदूषणामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर
औद्योगिक प्रदूषणाचा मुद्दाही आता ऐरणीवर आला आहे. कंपन्यांमधील घातक सांडपाणी कोणत्याही प्रक्रियेविना उघड्यावर सोडले जात असल्याने परिसरातील भूजल आणि पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित होत आहेत. यामुळे भविष्यात आरोग्याच्या भीषण समस्या निर्माण होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणी गोरख चोरमले, अजिंक्य काळे, अविनाश तरंगे यांच्यासह सुमारे ५० ग्रामस्थांनी प्रशासनाला अंतिम स्मरणपत्र दिले असून, तातडीने तपासणी करण्याची मागणी केली आहे.
आंदोलनाची हाक आणि इशारा
कामगार नेते अरुण होळकर यांनी परिस्थितीची पाहणी केल्यानंतर सांगितले की, “स्थिती केवळ कागदावर दिसते त्यापेक्षा कितीतरी पटीने गंभीर आहे. तात्काळ कारवाई न झाल्यास मोठे नुकसान होऊ शकते.” दुसरीकडे, पोलीस पाटील प्रमोद पाटील यांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल सज्ज असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, प्रशासनाने त्वरित दखल न घेतल्यास एमआयडीसीवर मोर्चा, धरणे, रास्ता रोको आणि आमरण उपोषणासारखी तीव्र आंदोलने छेडली जातील, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. यामुळे बळपुडी परिसरात तणावपूर्ण शांतता असून प्रशासन आता काय पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


