Repo Rate: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) आज वर्षातील आपल्या महत्त्वपूर्ण पतधोरणाची घोषणा केली. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी शुक्रवारी माहिती दिली की, रेपो दरात (Repo Rate) कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला असून तो ५.२५ टक्के इतकाच कायम ठेवला आहे. या निर्णयामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज किंवा वैयक्तिक कर्जाच्या व्याजदरात कोणताही बदल होणार नाही, परिणामी सर्वसामान्य ग्राहकांना ईएमआयमध्ये (EMI) तूर्तास कोणताही दिलासा मिळणार नाही. आरबीआयने आपली भूमिका ‘तटस्थ’ ठेवली असून, भविष्यातील परिस्थितीनुसार दर कपातीचे संकेत दिले आहेत.
अर्थव्यवस्था मजबूत; ७.४ टक्के जीडीपी वाढीचा अंदाज
आरबीआय गव्हर्नरांनी भारतीय अर्थव्यवस्थेच्या सद्यस्थितीवर समाधान व्यक्त केले आहे. भारताचा वास्तविक जीडीपी (GDP) विकास दर ७.४ टक्क्यांपर्यंत पोहोचण्याच्या मार्गावर असून भारत सध्या विदेशी गुंतवणुकीसाठी (FDI) जगातील पसंतीचे ठिकाण ठरत आहे. तसेच, अमेरिकेसोबत होणाऱ्या नवीन व्यापार करारामुळे भारताच्या निर्यातीला मोठी चालना मिळणार असल्याचा विश्वासही संजय मल्होत्रा यांनी व्यक्त केला. रेपो दरासोबतच एसडीएफ (SDF) ५ टक्के आणि एमएसएफ (MSF) ५.५० टक्के असा स्थिर ठेवण्यात आला आहे.
महागाईचे आव्हान आणि नवीन अंदाज
देशातील महागाई सध्या नियंत्रणात असली, तरी आरबीआयने भविष्यातील अंदाजांमध्ये किंचित वाढ केली आहे. आर्थिक वर्ष २०२६ साठी किरकोळ महागाई दर २ टक्क्यांवरून २.१ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच, २०२७ च्या पहिल्या तिमाहीसाठी महागाईचा अंदाज ४ टक्क्यांपर्यंत, तर दुसऱ्या तिमाहीसाठी ४.२ टक्क्यांपर्यंत सुधारण्यात आला आहे. वाढत्या जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महागाईवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचे आरबीआयने स्पष्ट केले.


