Pune News: येत्या काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. आधीच्या निवडणूका पाहता यंदाही निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग होणार असल्याच चित्र आहे. या इनकमिंगमुळे पक्षाच्या विजयात चांगला प्रभाव पडेल हे निश्चित आहे. मात्र, त्यामुळे निष्ठावंतांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. इनकमिंग न करता पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी द्या, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून होत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इनकमिंगबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
गेल्या शनिवारीच मुंख्यमंत्र्यांची पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीमध्ये निवडणुकांना सामोरे जाताना कशा पद्धतीने रणनीती आखावी तसेच स्वबळावरती का महायुतीमध्ये निवडणूक लढवावी? पक्षांमध्ये कोणत्या नेत्यांना प्रवेश द्यावा? याबाबत चर्चा झाली.
माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीसाठी रवींद्र चव्हाण महाराष्ट्रात प्रत्येक विभागाचा दौरा ठरवलेला आहे. दौऱ्यात विभागातील महानगरपालिका, पालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद याचा आम्ही आढावा घेत आहोत. पुण्यात पश्चिम महाराष्ट्राचा आढावा घेण्यात आला. यानंतर कोकण विभागाचा आढावा मुंबईत आयोजित करण्यात आलेला आहे.
मागच्या निवडणुकीत आणि आता काय परिस्थिती होती, युती संदर्भात आम्ही आढावा घेतला. अडचणी समजून घेतल्या. पक्षाची संघटना म्हणून बूथ रचना, निवडणुकीचे संघटनाबाबत चर्चा करून पुढील निर्देश देण्याचा आमचा प्रयत्न आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या आढाव्यात मंत्री, आमदार, पदाधिकारी आणि माजी जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते. आम्ही प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेतला आहे. सकारात्मक अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे.


