Chandrashekhar Bawankule : “बारामतीची निवडणूक बिनविरोध करून काँग्रेसने राजकीय सुसंस्कृतपणा दाखवावा, अन्यथा त्यांचा असा भीषण पराभव करू की त्यांना पुन्हा तोंड दाखवायला जागा उरणार नाही,” अशा कडक शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसला इशारा दिला आहे. सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारी अर्जाच्या पार्श्वभूमीवर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
अजितदादांच्या नात्याची काँग्रेसला आठवण
बावनकुळे यांनी काँग्रेसला भावनिक आवाहन करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, अजितदादांनी आपल्या राजकीय आयुष्यातील मोठा काळ काँग्रेससोबत व्यतीत केला आहे. त्यामुळे किमान जुन्या संबंधांचा आदर राखून काँग्रेसने सुनेत्रा वहिनींच्या विरोधात उमेदवार उभा करू नये. बारामतीत ७५ टक्क्यांहून अधिक मतांनी महायुतीचा विजय निश्चित आहे. काँग्रेसने निवडणूक लढवलीच, तर त्यांचा ऐतिहासिक पराभव अटळ आहे.
भाजपच्या वर्धापन दिनी ‘५१ टक्क्यां’चा संकल्प
आज भाजपच्या वर्धापन दिनानिमित्त बोलताना बावनकुळे यांनी पक्षाच्या भविष्यातील वाटचालीवर प्रकाश टाकला. राज्यात आणि देशात भाजपचे संघटन ५१ टक्क्यांहून अधिक नेण्याचे आमचे लक्ष्य आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर तरुणांना पक्षाशी जोडले जाईल. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बूथ पातळीपर्यंत पक्ष मजबूत करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
भोंदू खरात प्रकरण: दोषी अधिकाऱ्यांची खैर नाही
नाशिकच्या अशोक खरात प्रकरणावर भाष्य करताना बावनकुळे यांनी कडक भूमिका घेतली. “हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असून सध्या एसआयटी (SIT) यावर काम करत आहे. तपासात जे अधिकारी दोषी आढळतील, त्यांना थेट बडतर्फ करण्यात येईल,” असा इशारा त्यांनी दिला.


