BMC Election: राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजताच राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. मुंबई महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी आता ‘ठाकरे’ बंधूंच्या युतीची शक्यता बळावली आहे. गुरुवारी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
जागावाटपाचा तिढा सुटल्यानंतरच अधिकृत घोषणा?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील जवळीक वाढताना दिसत आहे. अनिल परब आणि राज ठाकरे यांच्या भेटीमध्ये युतीबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, जोपर्यंत जागावाटपाचा ठोस फॉर्म्युला ठरत नाही, तोपर्यंत युतीची अधिकृत घोषणा टाळण्याचे दोन्ही बाजूंनी ठरले असल्याचे समजते.
चर्चा सकारात्मक, राज ठाकरेच माहिती देतील: नितीन सरदेसाई
या महत्त्वाच्या भेटीनंतर मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, युतीबाबतची चर्चा सध्या अंतिम टप्प्यात असून सर्व काही सुरळीत सुरू आहे. वातावरण अत्यंत सकारात्मक असून आगामी काळात अशा भेटीगाठी सुरूच राहतील. युतीची अधिकृत घोषणा नेमकी कधी होईल, हे स्वतः राज ठाकरेच योग्य वेळी स्पष्ट करतील.
महायुतीत जागा वाटपावरून पेच
एकीकडे ठाकरे आणि मनसे एकत्र येण्याच्या हालचाली सुरू असताना, दुसरीकडे सत्ताधारी महायुतीत (भाजप-शिंदे गट) जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. भाजप नेते अमित साटम यांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात १३० जागांवर सहमती झाली आहे. मात्र, अद्याप ७७ जागांवरून दोन्ही पक्षांत मतभेद कायम आहेत. या उर्वरित जागांबाबत लवकरच वरिष्ठ पातळीवर तोडगा काढला जाण्याची शक्यता आहे.


