पुणे: शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना म्हणून सुचवलेला येरवडा ते कात्रज भुयारी मार्ग आता वास्तवात येण्याची शक्यता संपुष्टात आली आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले की, या बोगद्याचा खर्च अत्यंत प्रचंड असून वापर मात्र मर्यादित असल्यामुळे हा प्रकल्प व्यवहार्य नाही. त्यामुळे प्रकल्पाला हिरवा कंदील मिळण्याऐवजी तो जवळपास गुंडाळण्यात आला आहे.
बोगदा प्रकल्पाचा अहवाल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प सुचवला होता आणि पीएमआरडीएला त्याचा सविस्तर अहवाल तयार करण्याची जबाबदारी दिली होती. यासाठी मोनार्क या एजन्सीची नियुक्ती करण्यात आली. नुकत्याच झालेल्या पुम्टा बैठकीत प्राथमिक माहिती मांडण्यात आली. त्यानुसार, सुमारे 18 ते 20 किमी लांबीच्या सहा लेन बोगद्यांच्या कामासाठी तब्बल 7,500 कोटी खर्च अपेक्षित आहे.
हेही वाचा – Pune Traffic: आता पुणेकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका; AI आधारीत प्रकल्पामुळे सुटणार ट्राफिक जामची समस्या
खर्च-उपयोगात विसंगती
दरम्यान, फक्त 20 किमी रस्त्यासाठी 7,500 कोटी खर्च महापालिकेसाठी अवाढव्य आहे. याशिवाय, या रस्त्याचा वापर कमी वाहनांना होणार असल्याने प्रकल्प खर्च-उपयोगाच्या दृष्टीने परवडणारा नाही, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा – BRT Lane: पुणेकरांनो बीआरटी मार्गावरून वाहन चालवताय? फक्त दंड नाही तर आता लायसन्सही होणार रद्द
इतर प्रस्तावित बोगदे
याशिवाय, कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी मध्यवर्ती भागातील वाहतूक कोंडीसाठी सारसबाग–शनिवार वाडा आणि शनिवार वाडा–स्वारगेट या दोन बोगद्यांची संकल्पना मांडली होती. त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही पाहणीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र, शनिवार वाड्याजवळील वाहतूक कोंडीत गडकरी यांचा ताफा अडकल्याने पाहणी होऊ शकली नाही. शनिवार वाडा ही हेरीटेज वास्तू असल्याने तिच्या 100 मीटर परिसरात खोदाई किंवा बांधकामास बंदी आहे. त्यामुळे सुमारे 2,000 ते 2,500 कोटींच्या या प्रकल्पालाही महापालिकेकडून मंजुरी मिळण्याची शक्यता नाही. एकंदरित, येरवडा–कात्रजसह शनिवार वाड्याशी निगडित बोगदा प्रकल्प अव्यवहार्य ठरल्याने हे नियोजन कागदापुरतेच राहण्याची चिन्हे आहेत.


