Harshvardhan Sapkal On Devendra Fadnavis: राज्यातील वाढती गुंडागर्दी आणि भ्रष्टाचाराचे खरे सूत्रधार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, अशा शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर तोफ डागली. मुंबईसह २९ महापालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना सपकाळ यांनी सत्ताधारी महायुतीवर गंभीर आरोपांची सरबत्ती केली.
‘देवाभाऊ’ ते ‘टक्काभाऊ’: भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप
सपकाळ यांनी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख ‘टक्काभाऊ’ असा करत खळबळ उडवून दिली. ते म्हणाले, “भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष सध्या वसुलीच्या तीन मार्गांनी तिजोरी भरत आहेत. शासकीय योजना आणि निधी वाटप करताना मोठी टक्केवारी घेतली जात आहे. महाराष्ट्रात जे असभ्य राजकारण आणि केसाने गळा कापण्याचे प्रकार सुरू आहेत, त्यामागे फडणवीस यांचीच मानसिकता आहे.”
संघाच्या संस्थापकांना पुसण्याचा डाव?
भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर टीका करताना सपकाळ यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संदर्भ दिला. मोदी आणि शहा यांना संघाच्या संस्थापकांचे नाव पुसून स्वतःचे वर्चस्व निर्माण करायचे आहे. भविष्यात रेशीमबागेतील गोळवलकर गुरुजी आणि हेडगेवारांच्या फोटोंच्या जागी मोदी-शहांचे फोटो लावण्याची यांची मानसिकता असून, महाराष्ट्रात फडणवीस या विचारांचे नेतृत्व करत आहेत, असा दावा त्यांनी केला.


