Ahilyanagar Politics: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदार संग्राम जगताप यांच्या हिंदुत्वादी भूमिका पक्षाला आता जड जाताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संग्राम जगताप यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. सर्वच राजकीय पक्ष त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. अजित पवार यांनी पक्षाकडून संग्राम जगताप यांना नोटीस बजावल्याची सांगत सावरासावरी केली आहे. दरम्यान, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी संग्राम जगतापांची बाजू लावून धरली आहे.
संग्राम जगतापयांनी राष्ट्रहितासाठी, लोकांसाठी आणि धर्मासाठी भूमिका घेतली असे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे. मी कालही भैय्यांबरोबर होतो, आता पुढेही त्यांच्यासोबत आहे, असे सांगून त्यांच्या पक्षाने काढलेल्या नोटिशीवर ती त्यांच्या पक्षाची अंतर्गत बाब आहे, असे म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका करताना म्हटले की, “नुसती नोटीस बजावून काहीच होणार नाही, पक्षातून काढून टाकले पाहिजे, कोणीही व्यक्ती जर समाजात तेढ निर्माण करू, महाराष्ट्राच्या विरोधात, देशाच्या संविधानाविरोधात काम करत असेल, तर अशा व्यक्तीविरोधात स्ट्राँग अॅक्शन झाली पाहिजे. हा देश कोणाच्या मनमर्जीने चालणार नाही. हा देश भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने चालणार आहे.”
संग्राम जगताप यांनी हिंदुत्वाच्या भूमिकेवर करत असलेल्या विधानांवर, ‘त्यांचे जे विधान येत आहेत, ते महाराष्ट्र, देशाच्या आणि संविधानाच्या विरोधात आहे. त्यामुळे जास्त स्ट्राँग अॅक्शन आम्हाला अपेक्षित आहे. आणि हा विषय राजकारणाचा नाही, तर सामाजिक, भारत आणि महाराष्ट्राच्या ऐक्याचा विषय आहे,’ असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले.
त्यावर गोपीचंद पडखळकरांनी म्हटले की, “आमदार संग्रामभैय्या जेव्हा बोलतात, तेव्हा वादंग होत असतात. ते आपण काही थांबवू शकत नाही. लव्ह जिहाद, लँड जिहादच्या घटना अहिल्यानगर शहरात घडत आहेत. त्यावर संग्रामभैय्या रोखठोक भूमिका मांडतात. महाराष्ट्रात जिथं कार्यक्रम असतो, तिथं संग्रामभैय्या पोहोचतात. जो माणूस भूमिका घेतो, त्याचे ऐकलेच पाहिजे. जो माणूस भू्मिका घेत नाही, त्याचे का ऐकत बसायचे. परिणामांची, मतांची पर्वा न करता संग्रामभैय्या राष्ट्रहिताची भूमिका घेत आहेत. त्यामुळे त्यांच्यामागे ठाम उभं राहिलं पाहिजे. आमची भूमिका धर्म, लोकांच्या आणि देशाच्या हिताचे आहे.”


