Thackeray Brothers Joint Interview: महाराष्ट्राच्या राजकारणात दोन दशकांनंतर पुन्हा एकदा ‘ठाकरे’ नावाचे दोन दिग्गज एकाच चौकटीत पाहायला मिळत आहेत. शिवसेना (UBT) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्यातील नव्या युतीनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची पहिली ऐतिहासिक संयुक्त मुलाखत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मुलाखतीचा १ मिनिट ४० सेकंदांचा वादळी टीझर नुकताच प्रसिद्ध झाला असून, त्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजवून दिली आहे.
संजय राऊत आणि महेश मांजरेकरांची ‘जुगलबंदी’
या मुलाखतीचे वैशिष्ट्य म्हणजे ठाकरे बंधूंना बोलते करण्यासाठी खासदार संजय राऊत आणि ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर एकत्र आले आहेत. टीझरची सुरुवातच “महाराष्ट्राला हे चित्र पाहण्यासाठी २० वर्षे वाट का पाहावी लागली?” या राऊतांच्या बोचऱ्या प्रश्नाने होते. ठाकरे बंधूंच्या विभाजनापासून ते पुन्हा एकत्र येण्यापर्यंतचा प्रवास या चर्चेचा केंद्रबिंदू असल्याचे संकेत यातून मिळत आहेत.
हेही वाचा – Maharashtra Politics : महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार? अजित पवारांच्या सूचक वक्तव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ
सत्तेच्या मानसिकतेवर उद्धव ठाकरेंचा प्रहार
मुलाखतीत उद्धव ठाकरे अत्यंत आक्रमक रूपात दिसत आहेत. सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करताना ते म्हणतात, “राज्यकर्त्याचं प्रेम हे राज्यावर असलं पाहिजे, सत्तेवर नाही.” या एका विधानातून त्यांनी सत्तेसाठी राज्याच्या हिताकडे दुर्लक्ष करणाऱ्या नेत्यांना थेट इशारा दिला आहे. सध्याच्या राजकीय अस्थिरतेवर आणि सत्ता समीकरणांवर त्यांनी आपली नाराजी स्पष्ट शब्दांत व्यक्त केली आहे.
राज ठाकरेंचा फडणवीसांवर थेट निशाणा
दुसरीकडे, राज ठाकरे यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली आहे. “भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर फडणवीसांनी काही बोलूच नये,” अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नैतिक अधिकारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “करप्शन आणि कन्फ्यूजनची युती” या भाजपच्या टीकेला ठाकरे बंधू या मुलाखतीत सडेतोड उत्तर देणार असल्याचे दिसत आहे.
मुंबईच्या भवितव्याबाबत गंभीर आरोप
या चर्चेत मुंबईचा मुद्दा सर्वाधिक गाजण्याची शक्यता आहे. “मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे कारस्थान रचले जात आहे,” असा खळबळजनक आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. तसेच, मुंबईतील वाढती वाहतूक कोंडी आणि बकालपणावर महेश मांजरेकर यांनी ‘एक मुंबईकर’ म्हणून खंत व्यक्त केली. त्यावर भाष्य करताना राज यांनी इशारा दिला की, “मुंबई तर खराब झालीच आहे, पण आता पुण्याचाही विनाश लवकरच होईल.”
मुलाखत कधी प्रसिद्ध होणार ?
मुंबई महानगरपालिका (BMC) आणि इतर २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मुलाखत अत्यंत निर्णायक मानली जात आहे. ‘ठाकरे ब्रँड’ एकत्र आल्यानंतर आता राजकीय समीकरणे कशी बदलणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ही मुलाखत ८ आणि ९ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध होणार आहे. या मुलाखतीमुळे महायुती विरुद्ध ठाकरे युती असा सामना अधिक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.


