Ashok Kharat Case: धार्मिक विधी आणि भीती दाखवून महिलांचे शोषण करणाऱ्या अशोक खरात याच्या पापकर्मांचा पाढा आता पोलीस तपासात वाचला जात आहे. न्यायालयाने खरातला ८ एप्रिलपर्यंत पुन्हा पोलीस कोठडी सुनावली असून, त्याच्या कार्यालयातील झडतीत पोलिसांच्या हाती अघोरी कृत्यांसाठी वापरले जाणारे धक्कादायक साहित्य लागले आहे.
गुहेत सापडले अघोरी साहित्य
अशोक खरातच्या कार्यालयाची झडती घेतली असता, तेथे एखाद्या ‘गुहे’सारखी स्थिती असल्याचे दिसून आले. पोलिसांना तपासादरम्यान खालील वस्तू मिळाल्या आहेत:
- २२ रुद्राक्षांचा डबा आणि काळ्या रंगाचे संशयास्पद भिंग.
- अंक व इंग्रजी अक्षरे कोरलेली एक विशिष्ट पट्टी.
- एका बाटलीमध्ये असलेले अनाकलनीय हिरवे द्रव्य.
या साहित्याचा वापर भाविकांना भुरळ घालण्यासाठी किंवा अघोरी कृत्ये करण्यासाठी केला जात असावा, असा संशय ‘एसआयटी’ने (SIT) व्यक्त केला आहे.
बलात्कार आणि सक्तीचा गर्भपात
सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार, खरातने २०२० ते २०२६ या काळात एका महिलेला भविष्याची भीती दाखवून आपल्या जाळ्यात ओढले. ‘मंत्रांचे पाणी’ देण्याच्या नावाखाली तिच्यावर वारंवार अत्याचार केले. या शोषणातून पीडिता गर्भवती राहिली असता, तिला औषधे देऊन बळजबरीने गर्भपात घडवून आणल्याचा गंभीर आरोप खरातवर आहे. “विरोध केल्यास कुटुंबाचा नाश होईल,” अशी धमकी देऊन त्याने पीडितेचे तोंड बंद ठेवले होते.
मृत्यूची भीती दाखवून हडपली जमीन
तपासात खरातच्या फसवणुकीचा आणखी एक मोठा प्रकार उघड झाला आहे. सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील एका कुटुंबाची १६ लाखांची जमीन त्याने कवडीमोल भावात लाटली. “तुमची जमीन शापित असून ती न विकल्यास घरात मृत्यू होतील,” अशी भीती त्याने या कुटुंबाला घातली होती. दुर्दैवाने याच काळात कुटुंबातील एका मुलीचा मृत्यू झाला, ज्याचा फायदा घेत खरातने उरलेल्या दोघांच्या जिवाचे भय दाखवून जमीन स्वतःच्या पत्नीच्या नावावर करून घेतली. याच जमिनीवर त्याने ‘ईशान्येश्वर महादेव मंदिर’ उभारल्याची माहिती समोर आली आहे.
पत्नी कल्पना खरातविरुद्ध ‘लुकआऊट नोटीस’
या प्रकरणातील दुसरी संशयित आणि अशोक खरातची पत्नी कल्पना खरात अद्याप फरार आहे. ती देशाबाहेर पळून जाऊ नये यासाठी पोलिसांनी तिच्याविरुद्ध ‘लुकआऊट नोटीस’ जारी केली आहे. तपास पथकाने खरातचा मुलगा हर्षवर्धन आणि कल्पनाच्या दोन भावांचीही कसून चौकशी केली आहे. खरातने पीडितेच्या कागदपत्रांचा वापर करून काही बेकायदेशीर आर्थिक व्यवहार केले आहेत का, याचा तपास आता एसआयटी करत आहे.


