Mangesh Kalokhe Murder : रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे २६ डिसेंबर रोजी सकाळी घडलेल्या शिवसेना कार्यकर्ते मंगेश काळोखे यांच्या क्रूर हत्येप्रकरणी नवे वळण आले आहे. शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी या हत्येमागे बीड जिल्ह्यातील कुख्यात गुंड वाल्मिक कराड यांच्या गँगचे कनेक्शन असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
मुख्य आरोपी रवी देवकर याचा बॉडीगार्ड बीडचा असून, त्यानेच सीसीटीव्ही फुटेजनुसार मंगेश यांच्यावर १३ ते १९ वार केल्याचा दावा थोरवे यांनी केला. हा बॉडीगार्ड बीडमध्ये वॉन्टेड असतानाही त्याला खोपोलीत आणून हत्या घडवली गेली, असा आरोप कुटुंबीय आणि थोरवे यांनी केला आहे.
या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसशी (अजित पवार गट) संबंधित असल्याचा आरोप करत थोरवे यांनी धनंजय मुंडे, वाल्मिक कराड आणि रवी देवकर यांचा थेट उल्लेख केला. तसेच, राष्ट्रवादी नेते सुनील तटकरे कर्जतमध्ये येऊन आरोपींना पाठबळ देत असल्याचा आरोपही त्यांनी केला. “या हत्येमागे राजकीय सूड आणि राष्ट्रवादीचे कनेक्शन आहे,” असे थोरवे म्हणाले.
आतापर्यंत पोलिसांनी ८ ते ९ आरोपींना अटक केली असून, मुख्य आरोपी रवी देवकर, त्याची पत्नी उर्मिला देवकर, त्यांचे पुत्र दर्शन आणि धनेश यांच्यासह इतरांना ताब्यात घेतले आहे. त्यांना ५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मात्र, राष्ट्रवादीचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, भरत भगत आणि सचिन चव्हाण हे तिघे अद्याप फरार आहेत. या तिघांना तात्काळ अटक न झाल्यास पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचा सवाल थोरवे यांनी उपस्थित केला.
हत्येच्या निषेधार्थ आज (२९ डिसेंबर) साईबाबा नगर, खोपोली ते खोपोली पोलीस स्टेशन असा कॅन्डल मार्च काढण्यात येणार आहे. जर उर्वरित आरोपींना अटक झाली नाही तर शिवसैनिक पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन करू, असा इशारा थोरवे यांनी दिला. ते म्हणाले, “माझ्या कार्यकर्त्याची हत्या होताना आम्ही गप्प बसणार नाही. सर्व आरोपींवर मोक्का लावा, खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवा आणि कठोर शिक्षा द्या.”
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुटुंबीयांची भेट घेऊन न्यायाचे आश्वासन दिले असून, राष्ट्रवादी नेते सुनील तटकरे यांनी या हत्येचा निषेध करत एसआयटी चौकशीची मागणी केली आहे. प्रकरण राजकीय वैमनस्यातून घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असून, तपास सुरू आहे. परिसरात तणावाचे वातावरण असून, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


