Beed Politics : राज्यात भाजपने एमआयएमसोबत युती केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली असतानाच, आता बीड जिल्ह्यातील परळी येथे नवे राजकीय समीकरण उदयास आले आहे. परळी नगरपरिषद निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिवसेना (शिंदे गट) आणि एमआयएम यांनी एकत्र येत युती केली असून, भाजपने स्वतंत्र गट स्थापन केला आहे. या घडामोडीमुळे परळीतील राजकारण चांगलेच तापले आहे.
परळी नगरपरिषदेतील गटनेत्याची निवड जिल्हाधिकारी बीड यांच्या उपस्थितीत पार पडली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांच्या गटनेतेपदी नगरसेवक तथा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके यांची निवड करण्यात आली. या गटात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, मित्रपक्ष आणि दोन अपक्ष नगरसेवक असा एकूण २४ नगरसेवकांचा समावेश आहे. मित्रपक्षांमध्ये एमआयएमच्या नगरसेविका आयेशा मोसिन शेख यांचा समावेश आहे.
नगरपालिका निवडणुकांनंतर गटनेता निवडीच्या प्रक्रियेत परळी नगरपरिषदेत एमआयएमचा एक नगरसेवक निवडून आला असून, त्यांनी राष्ट्रवादी व शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा देत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, एमआयएमला सोबत घेतल्याने भाजपने वेगळा गट स्थापन करत आपला स्वतंत्र गटनेता निवडला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी ट्विट करत टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “बीडच्या परळीतील नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गट आणि एमआयएमची युती झाली आहे. राष्ट्रवादी नको म्हणणाऱ्यांनी परळीत एमआयएमसोबत हात मिळवले आहेत.”
या नव्या राजकीय समीकरणामुळे बीड जिल्ह्यातील स्थानिक राजकारणात पुढील काळात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


