छत्रपती संभाजीनगर: १७ वर्षीय चुलत बहीण प्रेमविवाह करण्यावर ठाम असल्याने संतप्त भावाने तिला चक्क २०० फूट उंच डोंगरावरून खाली ढकलून दिल्याने रक्तबंबाळ अवस्थेत तिचा जागीच मृत्यू झाला. वाळूज महानगरातील तिसगाव जवळच्या खवड्या डोंगराच्या पायथ्याशी सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या ‘ऑनर किलिंग’ प्रकरणाने जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी चुलतभावला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नम्रता गणेशराव शेरकर (रा. बोराम कॉलनी, शहागड ता. अंबड, जि. जालना) असे या मृत तरुणीचे नाव आहे. तर ऋषिकेश उर्फ वैभव नाजीराव शेरकर (रा. वळदगाव, ता. जि. छत्रपती संभाजीनगर) असे आरोपी भावाचे नाव आहे. इयत्ता १२ वीत शिकणारी नम्रताही शहागड (ता. अंबड) येथे आई-वडिलांसह वास्तव्यास होती. तिचे वडील पूजापाठ केरून उदरनिर्वाह करतात. घरी वडिलांसह कुटुंबाशी वाद होत असल्याने नम्रता १० दिवसांपूर्वी वाळूज येथील वळदगाव येथे तिचे काका तानाजीराव शेरकर यांच्याकडे राहायला आली होती.
दरम्यान, सोमवारी दुपारी चुलतभाऊ ऋषिकेश ऊर्फ वैभव शेरकर याने नम्रताला तुझे तुझ्या मित्राशी फोनवर बोलणे करून देतो असे सांगून दुचाकीवरून (एमएच-२०-जीएच-२६२४) खवड्या डोंगरावर घेऊन गेला होता. तेथे ऋषिकेश नम्रताला परजातीच्या मुलाशी मैत्री केल्याने कुटुंबाची बदनामी होईल, तू असे करू नकोस, तू शिक्षण घे, असे समजावून सांगत होता. पण ती त्या मुलाशी मैत्री ठेवण्यावर ठाम होती. त्यामुळे चिडलेल्या ऋषिकेशने काही कळायच्या आत तिला २०० फूट उंच डोंगरवरून खाली ढकलले. उंचीवरून खाली पडल्याने तिचा मृत्यू झाला असावा, असे समजून तो घराकडे निघाला होता.
दरम्यान, तेथील काही प्रत्यक्षदर्शी नागरिकांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी त्यास डोंगराच्या पायथ्याशी पकडले. त्यानंतर ही माहिती एमआयडीसी वाळूज पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे, सपोनि संजय गिते, पोउपनि दिनेश बन, पोह बाळासाहेब आंधळे, पोअं राजाभाऊ कोल्हे, मनोज बनसोडे, गोरख वाघ, सुरेश कचे, सुरेश भिसे, राजू चव्हाण हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नम्रताला बेशुद्धावस्थेत १०८ रुग्णवाहिकेतून घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
नम्रताचे गावातील मुलावर होते प्रेम
नम्रताचे गावातील एका मुलासोबत प्रेम असल्याने ती त्याच्यासोबत पळून गेली होती. त्यानंतर कुटुंबीयांनी तिची समजूत काढून पुन्हा घरी आणले होते. त्यानंतर तिचे समुपदेशन करण्यासाठी वळदगाव येथील काकाकडे पाठवले होते. दरम्यान, प्रेमप्रकरणाला कुटुंबीयांचा विरोध असल्याने भाऊ ऋषिकेश नम्रताला समजावून सांगत होता. घटनेच्या दिवशीही ती तिची अनेक मार्गांनी समजूत काढण्याचा प्रयत्न करत होता, पण ती ऐकायला तयार नव्हती, त्यातून पारा चढल्याने ऋषिकेशने हे कृत्य केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
ऋषिकेशची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची
ऋषिकेश हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने त्याच्याविरुद्ध सातारा पोलीस ठाण्यात मारामाऱ्या करणे, प्राणघातक हल्ले करणे असे गुन्हे दाखल आहेत, अनेक गुन्ह्यांमध्ये तो हर्सूल जेलची हवा खाऊन आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.


