Raosaheb Danve on Babanrao Lonikar : जालना जिल्ह्यातील परतूर नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने भाजपमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली. तब्बल ४० वर्षांनंतर माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे प्रथमच आमदार बबनराव लोणीकरांच्या बालेकिल्ल्यात दाखल झाले आणि दोघांनी एकत्र येऊन जुना वैमनस्य संपल्याची जाहीर घोषणा केली. मात्र, प्रचारसभेच्या मंचावर दानवेंनी लोणीकरांवर केलेली मिश्कील चिमटे आणि टोमणे सध्या जिल्ह्याभर चर्चेचा विषय ठरले आहेत.
भाजपने परतूरमध्ये स्वबळावर उमेदवार उभे केले असून, प्रचारासाठी दानवे स्वतः मैदानात उतरले. भाषणाच्या सुरुवातीलाच दानवे थेट लोणीकरांना म्हणाले, “बबनराव, आता तुमची वेळ पूर्ण झाली आहे. आता मागे व्हा आणि राहुल लोणीकरला पुढे करा!” पुढे त्यांनी लोणीकरांच्या राजकीय कारकीर्दीवर मिश्कील फटकारा लगावला. “तुम्ही आठ वेळा विधानसभेच्या निवडणुका लढलात… आठ वेळा ‘बाळंतपण’ झालं, पण एक टाका तरी पडला नाही तुम्हाला!” हे ऐकताच सभागृहात उपस्थित कार्यकर्ते खळखळून हसले.
दानवे थांबले नाहीत. ते पुढे म्हणाले, “मी बबनरावांच्या पाठीशी आहे. आता ते विधानसभा लढणार नाहीत असं पार्टीला सांगतो. मग परभणी लोकसभेची जागा द्या. हरिभाऊ बागडे यांनीही निवडणूक लढणार नाही म्हणाले, त्यांना राज्यपाल केलं. बबनराव, तुम्हाला जर राज्यपाल केलं तर आमचं ध्यान ठेवा बाबा… पार्टीचं काही सांगता येत नाही!”
बबनराव लोणीकर यांनीही मंचावरून प्रतिसाद दिला. ते म्हणाले, “आता आमच्यात कोणताही वाद राहिला नाही. दानवे साहेब आणि मी एकत्र आलोय. परतूरमध्ये भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून येतील. जिल्ह्यात भाजपची ताकद आता दुप्पट झाली आहे.”
दोन्ही दिग्गज नेत्यांचा हा एकत्रित मंच आणि दानवेंची मिश्कील शैली पाहून कार्यकर्ते उत्साहित झाले असले तरी राजकीय वर्तुळात “बबनराव आता खरंच निवृत्त होणार का?” अशी कुजबूज सुरू झाली आहे.


