बीड : सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येला वर्ष भर झाला तरी न्यायाची प्रक्रिया रखडली असताना, सामाजिक कार्यकर्ते बाळा बांगर यांनी खळबळजनक आरोप केले आहेत. आरोपी जेरबंद असले तरी वाल्मिक कराडची संपूर्ण यंत्रणा एका पोलीस अधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली कार्यरत असल्याचे सांगत, त्यांनी तत्कालीन बीड पोलिस एलसीबीचे (Local Crime Branch) पोलीस निरीक्षक (पीआय) या अधिकाऱ्यांना कराडच्या कामाचे ‘संरक्षण’ करत असल्याचा दावा केला.
“त्या अधिकाऱ्यांचे नाव लवकरच उघड करू. ही संस्थात्मक हत्या आहे, ज्यात यंत्रणा आणि अधिकाऱ्यांचा थेट समावेश आहे,” असा आरोप बांगर यांनी केला. हे विधान संतोष देशमुख कुटुंबीयांसोबतच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी केले.
बांगर यांनी पुढे सांगितले, “पोलीस यंत्रणेतील काही लोक अधीक्षकांना चुकीची माहिती देत आहेत. अधिवेशनात काही लोकप्रतिनिधी या प्रकरणावर बोलणार आहेत. आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत देशमुख कुटुंबीयांसोबत आहोत. त्यांनी कृष्णा आंधळे अजून सापडला नसल्याने संशय व्यक्त केला आणि १२ डिसेंबरला चार्जशीट दाखल होईल, तर पुढील ९ डिसेंबरपर्यंत आरोपींना फाशीची शिक्षा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
संतोष देशमुख यांची हत्या ९ डिसेंबर २०२४ रोजी बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावात झाली. ही हत्या अवाडा विंड एनर्जी कंपनीकडून दोन कोटी रुपयांची खंडणी मागण्याच्या प्रयत्नाशी जोडलेली आहे. वाल्मिक कराड, ज्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय मानले जाते, याने मुख्य कट रचल्याचा आरोप आहे. कराडवर १५ गुन्हे आधीच दाखल आहेत.
२९ नोव्हेंबर २०२४ रोजी वाल्मिक कराडने अवाडा पवनचक्की अधिकाऱ्यांकडून २ कोटींची खंडणी मागितली. न दिल्यास काम बंद पाडण्याची आणि अधिकाऱ्यांना मारण्याची धमकी. ६ डिसेंबर २०२४ : दुपारी साडेबारा वाजता कराडचे साथीदार अशोक घुले, सुदर्शन घुले, प्रतिक घुले यांनी प्रकल्पात अनधिकृत प्रवेश करून अधिकाऱ्यांना शिवीगाळ आणि मारहाण केली. वॉचमन मस्साजोग याने सरपंच संतोष देशमुख यांना बोलावले. देशमुख आणि साथीदारांनी गुंडांना हाकलले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामुळे कराडचा संताप झाला.
९ डिसेंबर २०२४ दुपारच्या सुमारास देशमुख यांना डोंगाव टोल प्लाझा जवळ ब्लॅक स्कॉर्पिओ SUV मध्ये अपहरण करून त्यांच्यावर तीन तासांपर्यंत क्रूरपणे छळ – कपडे काढून पाईप-लाकड्यांनी मारहाण केली.


