Eknath Shinde : धाराशिव जिल्ह्यात शिवसेनेतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. जिल्हा परिषद सभापती निवडीनंतर नाराजीचा सूर अधिक तीव्र झाला आहे.
शिवसेनेचे लोकसभा प्रमुख आनंद पाटील यांनी स्थानिक पदाधिकारी शिंदे यांच्या आदेशांचे पालन करत नसल्याचा आरोप करत संताप व्यक्त केला आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून इतरांना संधी दिली जात असल्याचा आरोप करत त्यांनी आणि त्यांच्या मातोश्रींनी पदाचा राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे.
आनंद पाटील आणि त्यांच्या मातोश्री या कानेगाव गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले आहेत. मात्र, सभापती पदाच्या निवडीत त्यांना संधी न मिळाल्याने त्यांची नाराजी उफाळून आली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीपासून हा तिसऱ्यांदा असा अंतर्गत वाद समोर आला आहे.
दरम्यान, धाराशिव जिल्हा परिषदेत महायुतीने सत्ता स्थापन केली असून सभापतीपदाच्या चार जागांपैकी दोन भाजप, एक शिवसेना (शिंदे गट) आणि एक राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली आहे. विविध खात्यांच्या सभापतीपदी अनुक्रमे सिद्धेश्वर कोरे, विश्वास कोकणे, भाऊसाहेब खरसडे आणि पूजा शिंदे यांची निवड झाली आहे.
सभापतीपदासाठी अनेक इच्छुक मैदानात होते, मात्र अंतिम निवडीत काहींची संधी हुकल्याने असंतोष वाढला आहे. आता हा वाद मिटवण्यासाठी एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात आणि नाराज नेत्यांची समजूत कशी काढतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


