Parbhani News : परभणी जिल्ह्यातून एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. परभणीतील संविधान विटंबना प्रकरणातील आरोपी दत्ता सोपान पवार याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. चार दिवसांपूर्वीच जामिनावर सुटलेला दत्ता पवार मिर्झापूर (ता. परभणी) येथील आपल्या शेतातील खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
जवळपास १३ महिन्यांनंतर दत्ता पवारला जामीन मंजूर झाला होता. जामिनानंतर तो आपल्या मूळ गावी मिर्झापूर येथे परतला होता. मात्र काही दिवसांतच त्याने आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
माहितीनुसार, दत्ता पवारच्या जामिनासाठी कोणीही पुढे न आल्याने ‘मोफत विधी सल्ला’ संस्थेमार्फत त्याला वैयक्तिक बाँडवर जामीन देण्यात आला होता. कुटुंबापासून दुरावल्यामुळे तो मानसिक तणावात होता. तुरुंगात असतानाही त्याच्यावर मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार सुरू होते. नैराश्यातूनच त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
१३ महिन्यांनंतर मिळालेला जामीन ठरला शेवटचा टप्पा
१० डिसेंबर २०२४ रोजी परभणी शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची विटंबना व तोडफोड झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणाने परभणीतच नव्हे तर राज्य आणि देशपातळीवर तीव्र पडसाद उमटले होते. या प्रकरणात दत्ता सोपान पवार याला अटक करण्यात आली होती आणि तो तब्बल १३ महिने कारागृहात होता.
दोन ते तीन दिवसांपूर्वीच जामिनावर सुटल्यानंतर तो मिर्झापूर गावी राहत होता. आज सकाळी त्याने शेतातील खोलीत दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.
दत्ता पवारची पत्नी आणि दोन मुले पुण्यात वास्तव्यास आहेत, तर इतर नातेवाईक परभणी जिल्ह्यातील विविध गावांत राहतात. जामिनानंतर नव्या आयुष्याची सुरुवात होईल, अशी अपेक्षा असतानाच घडलेल्या या घटनेने अनेकांना हादरवून सोडलं आहे.


