PM Kisan Yojana : राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुढील महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट ४,००० रुपये जमा होण्याची शक्यता आहे. पीएम किसान सन्मान निधी योजना आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत हा निधी मिळणार असून, त्यामुळे शेतकऱ्यांना एकाच वेळी ‘डबल गिफ्ट’ मिळणार आहे. विशेष म्हणजे, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या आधीच हा लाभ शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
केंद्र सरकारची पीएम किसान सन्मान निधी योजना देशभरातील पात्र शेतकऱ्यांसाठी राबवली जाते. या योजनेअंतर्गत वर्षाला ६,००० रुपये दिले जातात. प्रत्येकी २,००० रुपयांचे तीन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा केले जातात. याच धर्तीवर राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली असून, या योजनेतही शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी २,००० रुपये दिले जातात.
दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात पीएम किसान योजनेचा पुढील, म्हणजे २२ वा हप्ता येण्याची शक्यता आहे. पीएम किसानचा मागील हप्ता नोव्हेंबरमध्ये देण्यात आला होता. त्याच कालावधीत नमो शेतकरी योजनेचाही हप्ता मिळाल्यास शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण ४,००० रुपये जमा होणार आहेत.
नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी राज्याच्या कृषी विभागाने वित्त विभागाकडे सुमारे १,९३० कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. हा निधी मंजूर झाल्यानंतर लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत. ५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या आधी हा निधी वितरित होण्याची शक्यता असल्याने, शेतकऱ्यांना निवडणुकीपूर्वीच आर्थिक दिलासा मिळू शकतो.


