Eknath Shinde : दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यात परतताच महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. ठाण्यात मध्यरात्री उशिरा अकोल्यातील ठाकरे गटाच्या चार नगरसेवकांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला.
या घडामोडीमुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाला मोठा धक्का बसला असून अकोला महानगरपालिकेतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नुकत्याच निवडून आलेल्या सहापैकी चार नगरसेवकांनी गटबदल केल्याने ठाकरे गटाकडे आता केवळ दोनच नगरसेवक उरले आहेत.
मंगळवारी रात्री दोनच्या सुमारास ठाण्यातील शिंदे यांच्या ‘नंदनवन’ निवासस्थानी हा पक्षप्रवेश पार पडला. या वेळी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख मंगेश काळे यांनीही शिंदे गटाचा झेंडा हाती घेतला. पक्षप्रवेश करणाऱ्या नगरसेवकांमध्ये मनोज पाटील, सागर भरुका, सोनाली सरोदे आणि सुरेखा काळे यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे सुरेखा काळे या नुकत्याच महापौरपदाच्या शर्यतीत महाविकास आघाडीच्या उमेदवार होत्या.
दरम्यान, या घडामोडीनंतर अकोल्यातील ठाकरे गटाच्या संघटनात्मक ताकदीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून यावर पुढे उद्धव ठाकरे किंवा पक्षाच्या इतर नेत्यांची प्रतिक्रिया काय येते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
जावळीत महायुतीत तणाव?
सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात महायुतीतील अंतर्गत मतभेद उघडकीस आले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अंकुश बाबा कदम यांनी भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) नेते शशिकांत शिंदे यांच्यावर छुप्या युतीचा गंभीर आरोप केला आहे.
जावळी पंचायत समिती सभापती निवडणुकीत भाजपचे सौरभ शिंदे विजयी झाल्यानंतर कदम यांनी पत्रकार परिषद घेत नाराजी व्यक्त केली. “आम्हाला अंधारात ठेवून या दोन्ही नेत्यांनी हातमिळवणी केली आणि जनतेचा विश्वासघात केला,” असा आरोप त्यांनी केला.
तसेच, निवडणुकीपूर्वी ठरलेल्या समीकरणांनुसार शिवसेना आणि राष्ट्रवादीचे सदस्य एकत्र येणार होते. मात्र, ऐनवेळी घडलेल्या राजकीय हालचालींमुळे राष्ट्रवादीने तटस्थ भूमिका घेतली आणि भाजपचा विजय सोपा झाला, असा दावा त्यांनी केला.
या आरोपांमुळे साताऱ्यातील महायुतीतील अंतर्गत तणाव उघड झाला असून आगामी काळात याचे राजकीय परिणाम दिसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


