Mumbai News: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरच्या चैत्यभूमीकडे रवाना झालेल्या अनुयायांना पोलिसांनी चुनाभट्टी-सायन कनेक्टरजवळ रोखून धरल्याने परिसरात गोंधळ आणि तणाव निर्माण झाला. तुर्भे भागातून रिक्षांमधून मोठ्या संख्येने अनुयायी दादरकडे निघाले असताना पोलिसांनी त्यांना पुढे जाण्याची परवानगी नाकारली. अनुयायांनी आरोप केला की दरवर्षी आम्ही याच मार्गाने रिक्षातून येतो, परंतु यंदा अचानक अडवले जात आहे. आधी कळवले असते तर अशी परिस्थिती निर्माण झाली नसती. पोलिसांनी सांगितले की चुनाभट्टी-सायन कनेक्टरवर रिक्षा वाहतूक नियमांनुसार अनुमती नाही, त्यामुळे त्यांना थांबवण्यात आले.
रस्ता रोको, वाहतूक कोंडी
पोलिसांच्या कारवाईनंतर संतप्त अनुयायांनी पूर्व द्रुतगती महामार्गासह सायनजवळ रस्ता अडवला. त्यामुळे दादरकडे जाणाऱ्या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. रिक्षा पुढे नेण्याचा प्रयत्न होताच पोलिसांनी काही वाहनं थांबवली, यानंतर दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद घडला. या तणावामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली असून, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे.
इंदू मिल स्मारक
दरम्यान, दादरमधील इंदू मिल येथे उभारल्या जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या कामाचा वेग वाढला आहे. पुतळा संघर्ष समितीच्या पाठपुराव्यानंतर नव्या सरकारने नव्याने समन्वय समिती स्थापन केली असून, येत्या पावसाळ्यापर्यंत पुतळ्याचे स्ट्रक्चर उभे करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. स्मारक समितीच्या माहितीनुसार, सर्व अडथळे दूर राहिल्यास पुढील महापरिनिर्वाण दिनी स्मारकाचे लोकार्पण करण्याचा मानस आहे.


