मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील भव्य मराठा मोर्चा आज (29 ऑगस्ट) मुंबईत दाखल झाला. 27 ऑगस्टला जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीतून निघालेला हा मोर्चा शहागड, पैठण, शेवगाव, आळेफाटा, शिवनेरी, कल्याण, वाशी, चेंबूर मार्गे आझाद मैदानावर पोहोचला.
हजारो मराठा समाजबांधवांचा सहभाग असलेल्या या शांततामय आंदोलनाने संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलं आहे. मात्र, याच वेळी भाजपने महाविकास आघाडीवर (मविआ) जोरदार हल्ला चढवला आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्षावर घणाघाती टीका करत भाजपने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मविआची कोंडी केली आहे.
भाजपचा मविआवर हल्लाबोल
भाजप नेते केशव उपाध्ये यांनी एक्सवर पोस्ट करत मविआवर जोरदार टीकास्त्र सोडलं. “मराठा समाजाचं मुंबईतील आंदोलन ऐतिहासिक आणि शांततामय असेल, पण यावर बोलतंय कोण? मविआच्या काळात मराठा समाजाकडे दुर्लक्ष करणारे उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस! मराठा समाजाच्या मूक मोर्चाची ‘मुका मोर्चा’ म्हणून हेटाळणी करणारा ‘सामना’ आणि आरक्षण नको असं म्हणणारे शरद पवार, तसंच मराठा समाजाला फक्त मतपेढी मानणारा काँग्रेस पक्ष, आजही केवळ राजकारण करत आहे,” असा घणाघात उपाध्ये यांनी केला.
ते पुढे म्हणाले, “मनोज जरांगे यांनी सरकारवर टीका करणं हा त्यांचा लोकशाहीतील अधिकार आहे, पण आता शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसने ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी.” उपाध्ये यांनी मविआच्या नेत्यांना मराठा समाजाच्या मागण्यांवर गप्प का, असा सवाल उपस्थित केला.
केशव उपाध्ये यांनी भाजप आणि महायुती सरकारच्या मराठा समाजासाठीच्या कामगिरीचा पाढा वाचला.
महायुती सरकारने मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिलं, जे सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेलं नाही.
जरांगे यांच्या मागणीनुसार शिंदे समितीला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली.
मराठा आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना नोकऱ्या देण्याची मागणी जवळपास पूर्ण.
अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळामार्फत मराठा उद्योजकांसाठी 8,320 कोटींचं कर्जवाटप.
राजर्षी शाहू महाराज शुल्क प्रतिपूर्ती योजनेतून 17.54 लाख मराठा विद्यार्थ्यांना 9,262 कोटींचा लाभ.
उपाध्ये यांनी ठणकावून सांगितलं की, “देवेंद्र फडणवीस यांचं सरकार मराठा समाजाबाबत सर्वाधिक संवेदनशील आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय फडणवीस यांनीच घेतला. याउलट, मविआतील काँग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि शरद पवार यांनी कधीच स्पष्ट भूमिका घेतली नाही.”
मविआवर टीकेची झोड
उपाध्ये यांनी मविआवर सामाजिक न्यायाशी द्रोह केल्याचा आरोप केला. “मराठा समाजाला न्याय देणारे फडणवीस आणि कोणतीही ठोस भूमिका न घेणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांचं राजकारण हाणून पाडा,” असं आवाहन त्यांनी मराठा समाजाला केलं. त्यांनी मविआच्या नेत्यांनी जरांगे यांच्या ओबीसी कोट्यातून आरक्षणाच्या मागणीवर गप्प बसण्यामागील हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
जरांगे यांच्या मागण्या काय?
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावं, सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी, आंदोलनातील गुन्हे मागे घ्यावेत आणि मृत आंदोलकांच्या वारसांना नोकऱ्या मिळाव्यात, अशा प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत. त्यांनी सरकारला इशारा देताना म्हटलं, “हा शेवटचा लढा आहे, आता विजयाचा गुलाल लावायचा आहे. कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही.” जरांगे यांनी यापूर्वीही फडणवीस यांच्यावर टीका करताना, “मराठा समाजाला आरक्षण न देणं आणि फक्त काही जातींची काळजी घेणं” यावरून टीकास्त्र सोडलं होतं.


