Maharashtra Weather Update : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्याच्या हवामानात मोठा बदल पाहायला मिळाला. मुंबईत अचानक आलेल्या पावसाच्या सरींमुळे नागरिकांची धावपळ उडाली, तर उर्वरित महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव अधिक तीव्र झाला आहे. गुलाबी थंडी सुरू असतानाच पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात लक्षणीय बदल जाणवतो आहे.
दक्षिण मुंबईत तुलनेने जोरदार पाऊस पडला, तर उपनगर आणि नवी मुंबईत हलक्या सरी पडल्या. अरबी समुद्रातून येणारे आर्द्र वारे आणि पश्चिमेकडून येणाऱ्या थंड हवामानामुळे राज्यातील अनेक भागांत ढगाळ वातावरण निर्माण झाल्याचं हवामान विभागाने स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून दक्षिण भारतात, विशेषतः तमिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचा परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर होणार असून पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमान 1 ते 2 अंशांनी वाढण्याची शक्यता आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांत किमान तापमानात मोठी घसरण नोंदवली गेली आहे. परभणीमध्ये 6.8 अंश सेल्सिअस इतकं सर्वात कमी तापमान नोंदवलं गेलं, तर धुळे आणि जळगावसह उत्तर महाराष्ट्रातही गारठा जाणवतो आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांत मागील दोन आठवड्यांपासून किमान तापमान 10 अंशांच्या खाली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस थंडी कायम राहणार असून त्यानंतर तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. मुंबईत पावसामुळे वातावरणात बदल झाला असला, तरी उर्वरित महाराष्ट्रात गारठा अधिक वाढल्याचं चित्र आहे.


