Mumbai-Pune Missing Link: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगांना छेदत उभारला जाणारा बहुचर्चित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, येत्या १ मे २०२६ रोजी म्हणजेच ‘महाराष्ट्र दिना’चे औचित्य साधून हा मार्ग प्रवाशांसाठी खुला होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पामुळे लोणावळा-खंडाळा घाटातील अवघड वळणे आणि वाहतूक कोंडीतून प्रवाशांची कायमची सुटका होणार आहे.
प्रवासात काय बदलणार?
नवीन १४ किमीच्या या मार्गामुळे प्रवाशांचा तब्बल २५ ते ३० मिनिटांचा वेळ वाचणार आहे. तसेच प्रवाशांना आता खंडाळ्याचा घाट चढण्याची गरज भासणार नाही. ज्यांना लोणावळ्यात जायचे आहे, तेच जुना घाट वापरतील. इतरांसाठी हा प्रवास थेट आणि वेगवान असेल. मुंबई-पुणे प्रवासाचे एकूण अंतर ६ किमीने कमी होणार आहे.
अभियांत्रिकीचा अविष्कार आणि वैशिष्ट्ये
हा प्रकल्प म्हणजे भारतीय अभियांत्रिकीचा एक चमत्कार मानला जात आहे. यामध्ये विशेष आकर्षणे खालीलप्रमाणे आहेत:
सर्वात उंच पूल: सह्याद्रीच्या दरीत उभारलेला १८० मीटर उंच ‘केबल-स्टेड’ (Keel-Stayed) पूल.
मोठे बोगदे: ८.८७ किमी आणि १.६७ किमी लांबीचे दोन भव्य बोगदे तयार करण्यात आले आहेत.
सुरक्षितता: घाट रस्ता टाळल्यामुळे पावसाळ्यातील दरडी कोसळण्याच्या घटना आणि अपघातांचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होईल. मिसिंग लिंक प्रकल्पामुळे केवळ वेळ आणि इंधन वाचणार नाही, तर हा महामार्ग आशियातील सर्वात प्रगत मार्गांपैकी एक ठरेल. शेवटच्या टप्प्यातील कामे सध्या युद्धपातळीवर सुरू असल्याचं MSRDC अधिकाऱ्यांने सांगितलं आहे.


