Raj Thackeray : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत तब्बल 25 वर्षांनंतर ठाकरेंचा बालेकिल्ला ढासळल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भावूक प्रतिक्रिया दिली आहे. भाजप-शिंदे गटाने मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवत ठाकरे गटाला मोठा धक्का दिला. या निकालानंतर राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचे अभिनंदन करत कार्यकर्त्यांना नवी दिशा दिली आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप 89 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला, तर ठाकरे गटाला 65 जागांवर समाधान मानावे लागले. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी “ही निवडणूक सोपी नव्हती. अचाट धनशक्ती आणि सत्तेच्या ताकदीविरुद्ध शिवशक्तीची लढाई होती,” असे म्हणत मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या संघर्षाचे कौतुक केले.
राज ठाकरे म्हणाले की, मनसेला अपेक्षित यश मिळाले नसले तरी पक्ष खचणारा नाही. निवडून आलेले नगरसेवक सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील आणि मराठी माणसाच्या विरोधात काही घडत असल्यास त्याला ठामपणे विरोध करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
“आपली लढाई मराठी माणसाची, मराठी भाषेची, मराठी अस्मितेची आणि समृद्ध महाराष्ट्रासाठीची आहे. ही लढाई म्हणजेच आपलं अस्तित्व आहे,” असे सांगत राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दीर्घकालीन संघर्षासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.
पोस्टच्या शेवटी त्यांनी “निवडणुका येतील-जातील, पण आपला श्वास हा मराठी आहे, हे विसरायचं नाही. पुन्हा कामाला लागूया, नव्याने पक्ष आणि संघटना उभारूया,” असे भावूक शब्द लिहित कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.


