Raju Patil : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात मनसे आक्रमक झाली आहे. सदावर्ते यांनी राज ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत टीका केल्यानंतर मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी त्यांना सूचक इशारा दिला आहे.
राजू पाटील म्हणाले, “फिरताना जरा जपून फिरा. कोणीही येऊन हल्ला करेल आणि नंतर त्याचं खापर मनसेवर फोडलं जाईल.” त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
यावेळी त्यांनी सदावर्तेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधत, “कोण काय बोलतंय यापेक्षा त्यांची लायकी काय आहे हे महत्त्वाचं आहे. त्यांचा बोलविता धनी कोण आहे, हे सगळ्यांना माहिती आहे,” असे म्हटले. अशा व्यक्तींना महत्त्व देण्याची गरज नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, डोंबिवलीतील ‘आन ठाकूर मान ठाकूर शौर्यगाथा’ कार्यक्रमावरूनही राजू पाटील यांनी भाजपवर टीका केली. आगरी समाजाची दखल घेणे स्वागतार्ह असले तरी प्रत्येक समाजासाठी समान पद्धतीने काम झाले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.


