मुंबई : ९ वर्षांनंतर झालेल्या महाराष्ट्रातील नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकीत (२ डिसेंबर) सत्ताधारी महायुतीने “पाण्यासारखे पैसे वाटले” असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या “पारदर्शक कारभार” आणि “भ्रष्टाचारमुक्त भारत” या दाव्यांवर सुळे यांनी सडकून टीका करत, नोटबंदीनंतरही काळा पैसा कुठून येतो, असा सवाल उपस्थित केला.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, “भाजपचे सरकार असूनही महाराष्ट्रात काल पाण्यासारखे पैसे वाटले गेले. नोटबंदीचा दावा करणारे पंतप्रधान आणि पारदर्शकतेचा डंका पिटणारे मुख्यमंत्री असतानाही हे घडतंय. दोन महिन्यांपूर्वी एका मंत्र्यांच्या घरी पैशांनी भरलेली बॅग सापडली, तिची चौकशी झाली का? या निवडणुकीत जे घडलं ते भीषण आहे. हा महाराष्ट्राच्या इतिहासातील काळा दिवस आहे.” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
निलेश राणेंचे कौतुक, पण गुन्हा दाखल झाल्याने संताप
सुळे यांनी भाजपचे आमदार निलेश राणे यांचे विशेष कौतुक केले. त्या म्हणाल्या, “निलेश राणे यांनी मालवणमध्ये मतदारांना वाटले जाणारे पैसे पकडले, मोठी हिंमत दाखवली. मी संसदेत नारायण राणे यांना भेटून सांगितलं, ‘तुमच्या मुलाने चांगलं काम केलं.’ पण आता निलेश राणेंविरुद्धच गुन्हा दाखल झाला. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. आता कोणावर विश्वास ठेवायचा? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हात जोडून विनंती करते काहीतरी करा,’ असंही सुळे यांनी म्हटलं.
सुप्रिया सुळे यांनी या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेची चौकशी करून ती रद्द करण्याची मागणी केली असून, हा मुद्दा संसदेच्या हिवाळी अधिवेशनात जोरदारपणे मांडणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच निवडणूक आयोगाला याबाबत पत्र लिहिणार असल्याचे सांगितले.
दरम्यान, राज्याच्या विविध भागांत पैशांचे वाटप, बोगस मतदान, ईव्हीएम बिघाड अशा अनेक तक्रारी समोर आल्या असून, पहिल्या टप्प्यातील मतदानावर पैशांच्या प्रभावाचा ठपका बसला आहे. निकाल २१ डिसेंबरला जाहीर होणार असले तरी या आरोपांमुळे महायुती सरकारवर मोठे संकट निर्माण झाले आहे.


