नाशिक : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात शिक्षकांची जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया सुरू असून, संवर्ग एक अंतर्गत ६६२ शिक्षकांच्या बदल्या पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये मालेगाव तालुक्यातील सर्वाधिक १०३ शिक्षकांचा समावेश आहे. संवर्ग दोन अंतर्गत पात्र शिक्षकांना आता ‘प्राधान्य अर्ज’ भरण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
जिल्ह्यातील ३,२६३ प्राथमिक शाळांमध्ये सुमारे १० हजार शिक्षक कार्यरत आहेत. नवीन शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू होत असले तरी यंदा बदली प्रक्रिया उशिरा सुरू आहे. मे महिन्यात पूर्ण होणारी ही प्रक्रिया शाळा सुरू झाल्यावरही सुरू आहे. संवर्ग एकमधील २,४६४ शिक्षकांपैकी ६६२ शिक्षकांच्या बदल्या झाल्या असून, यात दिव्यांग, ५३ वर्षांवरील, गंभीर आजार (कर्करोग, हृदय शस्त्रक्रिया, यकृत प्रत्यारोपण, थैलेसेमिया इ.) असलेले शिक्षक, तसेच विधवा, कुमारिका, परित्यक्ता आणि स्वातंत्र्यसैनिकांचे वंशज यांचा समावेश आहे.
शिक्षकांनी शुक्रवार (दि. ११) पासून ऑनलाइन अर्ज सादर केले होते. मात्र, शाळा सुरू असल्याने बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त होण्यासाठी दिवाळी सुटीपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. संवर्ग दोन अंतर्गत पती-पत्नी एकत्रीकरणाला प्राधान्य देण्यात येईल, जिथे दोघांच्या शाळांमधील अंतर ३० किलोमीटरपेक्षा जास्त नसेल याची काळजी घेतली जाईल. ही प्रक्रिया पूर्ण होताच शिक्षण विभाग पुढील टप्प्यातील बदल्यांवर लक्ष केंद्रित करेल, ज्यामुळे शिक्षकांना त्यांच्या पसंतीच्या शाळांमध्ये सेवा देण्याची संधी मिळेल.
तालुकानिहाय बदली झालेले शिक्षक
मालेगाव: १०३, नाशिक ८४, दिंडोरी ७०, निफाड : ६३, सिन्नर : ४५, इगतपुरी: ३५. कळवणः ३२, देवळा ३१, चांदवड ३०, येवला २६, नांदगाव: १८, त्र्यंबकेश्वर: १८, सुरगाणा १५, पेठ: १०, बागलाण ८२, एकूण ६६२.


