संगमनेर (अहिल्यानगर) : संगमनेर नगरपालिका निवडणुकीत प्रचाराचा धुराळा उडाला असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी (ता. २८) घेतलेल्या सभेत दोन मंत्र्यांना स्टेजवरून फोन लावून कामे तत्काळ मंजूर केली. याच ‘फोन ऑर्डर’वर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी घेतलेल्या सभेत मिश्किल पद्धतीने खिल्ली उडवली आणि शिंदे गटाला चांगलेच सुनावले.
काय थोरात म्हणाले?
बाळासाहेब थोरात म्हणाले, “हे जिथे जातील तिथे मंत्र्यांना फोन लावून ‘हे मंजूर-ते मंजूर’ करतात. निवडणुकीत स्टंट करायला लागतात, पण त्यालाही मर्यादा असते. लोक म्हणतात पाणी हवं तर धरण मंजूर, धरणाला नदी नाही तर नदी मंजूर, नदीला पाणी नाही तर डोंगर मंजूर! अशी बनवाबनवीची सवय लागली आहे.”
रस्त्यावरून थेट निशाणा
शिंदे आणि सुजय विखे पाटील यांच्यावर हल्ला चढवताना थोरात पुढे म्हणाले, “खासदारकी, आमदारकी, मंत्रीपद असतानाही तुम्हाला नगर-मनमाड महामार्गाचा एक रस्ताही करता आला नाही. आधी तो रस्ता पूर्ण करा, मग संगमनेरच्या जनतेला विकासाच्या गप्पा मारायला या. काल जे आले त्यांना सत्यजित तांबेंनी उत्तर दिलं. मोठ्यांना उत्तर द्यायची जबाबदारी माझी आहे,” असंही बाळासाहेब थोरात म्हणाले.
सुजय विखेंच्या ‘टायगर अभी जिंदा है’वर सत्यजित तांबेंचा पलटवार
एकनाथ शिंदे यांच्या सभेत सुजय विखे पाटील यांनी “टायगर अभी जिंदा है” अशी घोषणा देत थोरात-तांबे जोडीवर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना सत्यजित तांबे म्हणाले, “वाघ जिंदा आहे की सिंह, हे संगमनेरची जनता १ डिसेंबरला मतदानातून दाखवून देईल.” दोन्ही बाजूंकडून सभा-प्रचारात बोचऱ्या टोमण्यांची लढत सुरू असल्याने संगमनेर नगरपालिका निवडणुकीची रंगत आता शिगेला पोहोचली आहे. १ डिसेंबरला होणाऱ्या मतदानाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


