अहिल्यानगर : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राहुरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार शिवाजीराव भानुदास कर्डीले यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. सहा वेळा आमदार म्हणून त्यांनी राहुरी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे ते सासरे होत.
शिवाजीराव कर्डीले यांचा प्रवास
शिवाजीराव कर्डीले यांनी २००९ मध्ये भाजपकडून निवडणूक लढवत ५७,३८० मतांनी विजय मिळवला होता. २०१४ मध्ये त्यांनी ९१,४५४ मतांनी पुन्हा यश संपादन केले. सुरुवातीला दुधाचा व्यवसाय, गावचे सरपंचपद, अपक्ष आमदार म्हणून निवडणूक आणि नंतर भाजपमधून यशस्वी राजकीय कारकीर्द अशी त्यांची वाटचाल होती.
जमीन व्यवहार, बांधकाम साहित्य पुरवठा आणि हॉटेल उद्योगातही त्यांनी नाव कमावले. २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या प्रचारासाठी राहुरीत जाहीर सभा घेतली होती. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला. कर्डीले यांच्या निधनाने अहिल्यानगर जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.


