Who Is Madhavi Jadhav-Girish Mahajan : नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित शासकीय कार्यक्रमात मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्या भाषणावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव भाषणात न घेतल्याने वन विभागाच्या कर्मचारी माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे यांनी जाहीरपणे आक्षेप नोंदवला. यामुळे कार्यक्रमस्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पोलीस तक्रार दाखल केली असून, ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्याची मागणीही केली आहे. या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी माधवी जाधव यांच्याशी फोनवरून संवाद साधत त्यांना पाठिंबा दर्शवला आहे.
नेमकं प्रकरण काय?
प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात भाषण करताना गिरीश महाजन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतले नाही, असा आरोप करत माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे यांनी कार्यक्रमादरम्यान थेट सवाल उपस्थित केला. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी दोघींनाही ताब्यात घेऊन सरकारवाडा पोलीस ठाण्यात आणले. या घटनेनंतर त्यांच्या समर्थनार्थ नागरिकांनी पोलीस ठाण्याबाहेर जमून घोषणाबाजी केली आणि महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
‘बाबासाहेबांची ओळख पुसली जाऊ देणार नाही’ : माधवी जाधव
या प्रकरणावर बोलताना माधवी जाधव म्हणाल्या, “ज्यांनी संविधान दिलं, लोकशाही घडवली, त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव वगळणं ही मोठी चूक आहे. मला निलंबित केलं तरी चालेल, पण मी माफी मागणार नाही. कितीही काम दिलं तरी करेन, पण बाबासाहेबांची ओळख पुसली जाऊ देणार नाही.”
कोण आहेत माधवी जाधव?
माधवी जाधव या वन विभागातील वनरक्षक म्हणून कार्यरत आहेत. 2011 साली त्या शासकीय सेवेत भरती झाल्या असून, सध्या त्या सिन्नर येथे कार्यरत आहेत.
गिरीश महाजन काय म्हणाले?
या वादावर प्रतिक्रिया देताना गिरीश महाजन म्हणाले, “मला आज खूप वाईट वाटलं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीमध्ये मी नेहमी पुढाकार घेतो. जामनेरमध्ये बाबासाहेबांचा भव्य पुतळा उभारला आहे. अनवधानाने नाव राहिलं असेल, पण यावरून एवढा गहजब कशासाठी?” असे सांगत त्यांनी समाजात तेढ निर्माण करू नये, असे आवाहन केले.


