Sunetra Pawar : पुणे महापालिकेतील क्षेत्रीय कार्यालयांच्या पुनर्रचनेवरून महायुतीतच वाद उफाळून आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेत्या सुनेत्रा पवार यांनी या मुद्द्यावर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहत आक्षेप नोंदवला आहे.
महापालिकेच्या नव्या रचनेनुसार १५ क्षेत्रीय कार्यालयांचे पुनर्विभाजन करण्यात आले आहे. मात्र या रचनेत भारतीय जनता पक्षाला १४ प्रभाग समित्यांवर वर्चस्व मिळणार असल्याचे चित्र आहे, तर काँग्रेसला केवळ एक समिती मिळणार आहे. विशेष म्हणजे, दुसऱ्या क्रमांकाचे संख्याबळ असूनही राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ला एकही प्रभाग समिती मिळत नसल्याने नाराजी वाढली आहे.
यावर आक्षेप घेत सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे की, ही पुनर्रचना भौगोलिकदृष्ट्या चुकीची असून नागरिकांना प्रशासकीय कामांसाठी अडचणी निर्माण होणार आहेत. तसेच या निर्णयामागे राजकीय हेतू असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान, या पत्राची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने नगरविकास विभागाकडून सविस्तर अहवाल मागवला आहे. प्रशासनाने कोणत्या निकषांवर ही पुनर्रचना केली, याची चौकशी होणार आहे.
या घडामोडींमुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले असून, ही पुनर्रचना रद्द होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


