Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे गेल्या काही दिवसांपासून हाडं गोठवणारी थंडी जाणवत आहे. धुळे जिल्ह्यात किमान तापमान ६ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले असून, जनजीवनावर याचा मोठा परिणाम दिसून येतोय. सकाळी दाट धुके आणि दिवसभर हुडहुडी भरवणारी थंडीमुळे नागरिकांना घराबाहेर पडतानाही काळजी घ्यावी लागत आहे.
भारतीय हवामान विभागाने (IMD) धुळे, जेऊर (सोलापूर), निफाड (नाशिक) आणि परभणी या चार भागांत तीव्र थंडीच्या लाटेचा हाय अलर्ट जारी केला आहे. या ठिकाणी तापमान ५-६ अंशांच्या आसपास नोंदवले गेले आहे. ला नीना प्रभावामुळे जानेवारीपर्यंत ही थंडी कायम राहण्याची शक्यता आहे.
पुण्यात थंडीचा जोर वाढला
पुणे, नाशिक, अहमदनगर आणि सातारा भागांत गुलाबी थंडीचा अनुभव येत आहे. महाबळेश्वरमध्ये किमान तापमान १० अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. पुणेकरांना सकाळी थंडीची हुडहुडी जाणवत असून, दिवसेंदिवस तापमान घसरत आहे.
साताऱ्यात ‘मिनी काश्मीर’ची अनुभूती
सातारा जिल्ह्यात थंडीचा प्रभाव आणखी तीव्र आहे. महाबळेश्वरपेक्षा साताऱ्यात तापमान कमी नोंदवले गेले असून, येथे ९ अंश सेल्सिअसपर्यंत पारा खाली आला. ग्रामीण भागात शेकोट्या पेटवल्या जात आहेत. मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची संख्या घटली असून, नागरिक ‘मिनी काश्मीर’सारखा अनुभव घेत आहेत.
काहीसा दिलासा अपेक्षित
हवामान विभागानुसार, येत्या ७ दिवसांत तापमानात मोठा बदल होणार नाही, मात्र विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात थोडी वाढ होऊन थंडीचा जोर किंचित कमी होईल. तरी उत्तर महाराष्ट्रात दाट धुके आणि थंडी कायम राहणार आहे. थंडीपासून बचावासाठी गरम कपडे, शेकोट्या आणि गरम पेयांचा वापर करा. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी काळजी घ्यावी.


