रायगड: रायगडच्या वरंध घाटात बुधवारी एक भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. वरंध घाट हा रायगड आणि पुणे जिल्ह्यांना जोडणारा घाट म्हणून ओळखला जातो. अपघातात मोटरसायकल स्वार चालकाचा 100 फूट वरून कोसळल्याने जागीच मृत्यू झाला. हा तरुण मुंबई वरून भोर तालुक्यातील शिळींब या मूळ गावात जात असताना घाटातील साईट पट्टीचा अंदाज न आल्याने गाडी 100 फुट खोल खाली कोसळली.
मृत व्यक्तीची ओळख पटली असून त्याचे नाव शिवाजी डेरे असे होते. ते भोर तालुक्यातील शिळींब गावाचा रहिवासी होते. त्यांची दुचाकी साईड पट्टी सोडून खाली आल्याने शिवाजी डेरे घसरुन खालच्या रस्त्यावर आपटले. त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी महाड एमआयडीसीचे पोलिस दाखल झाले असून या घटनेची सखोल चौकशी करत आहेत.
अपघाताच कारण समोर आलेलं नाही. मात्र,चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याच सांगण्यात येत आहे. पोलीस सध्या घटनेचा तपास करत आहेत. लवकरच अपघाताचे कारण समोर येईल.
मुंबई गोवा महामार्गावर अपघात
मुंबई गोवा महामार्गावर बुधवारी लोटे येथे कारला एका कंटेनरने मागून धडक दिली. कंटेनरच्या धडकेत मुंबईतून गोव्याच्या दिशेने जाणारी कार रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला फुटबॉलसारखी उडाली. सुदैवाने कोणालाही दुखापत नाही मात्र कारचे प्रचंड नुकसान झाले. कारमधील दोन्ही प्रवासी सुखरूप आहेत. कारला मागून ठोकून पळून जाणाऱ्या कंटेनर चालकाला स्थानिकांनी पाठलाग करून पकडले. वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल कंटेनर चालकावर गुन्हा दाखल केला.


