Maharashtra Weather : भारतीय हवामान विभाग च्या इशाऱ्यानुसार महाराष्ट्रात उष्णतेची लाट अधिक तीव्र होत असून अनेक भागांत तापमानाने 40 अंशांचा टप्पा पार केला आहे. विदर्भात तर उन्हाचा तडाखा जबरदस्त वाढला असून अकोला 43.1 अंशांसह जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वाधिक उष्ण शहर ठरले. नागपूरमध्ये 41.4 अंश, अमरावती 42.4 अंश, वर्धा 42 अंश, वाशीम 41.6 अंश आणि चंद्रपूर 41 अंश तापमानाची नोंद झाली आहे.
आठवडाभरात उष्णतेची तीव्रता आणखी वाढणार असल्याचा अंदाज नागपूर वेधशाळेने व्यक्त केला आहे. पुढील काही दिवस तापमान 45 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता असून नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागाने दुपारी 11 ते 4 या वेळेत अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असा इशाराही दिला आहे. सध्या राज्यात कोरडे आणि उष्ण वारे वाहत असल्याने उकाडा वाढला आहे. मागील 24 तासांत उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. जळगाव, मालेगाव आणि सोलापूरमध्येही पारा 41 अंशांच्या पुढे गेला आहे.
दरम्यान, जळगाव, मालेगावसह पाच जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 15-16 एप्रिलदरम्यान उत्तर भारतात ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’ सक्रिय होणार असले तरी त्याचा महाराष्ट्रावर कोणताही थेट परिणाम होणार नाही. त्यामुळे राज्यात आकाश निरभ्र राहून सूर्याची किरणे थेट पडणार आणि उष्णतेत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.


