Parth Pawar : बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीकडे सध्या राज्यासह देशाचे लक्ष लागले असून या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. बारामतीची निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती, मात्र काही लोकांनी मुद्दाम उमेदवार उभे केल्याचा दावा त्यांनी केला.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना पार्थ पवार म्हणाले की, अनेकांची इच्छा होती की ही निवडणूक बिनविरोध व्हावी. मात्र तसे झाले नाही. काही उमेदवारांच्या विविध मागण्या होत्या आणि काही प्रतिस्पर्धी उमेदवार मुद्दाम उभे करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी होणाऱ्या सांगता सभेबाबतही त्यांनी माहिती दिली. सभेची तयारी सुरू असून राज्यभरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. या सभेला देवेंद्र फडणवीस, उदय सामंत, रामदास आठवले आणि सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
उष्णतेच्या पार्श्वभूमीवर मतदानाचे आव्हानही त्यांनी मान्य केले. “ऊन प्रचंड आहे, त्यामुळे मतदारांना घराबाहेर काढणे मोठे आव्हान असेल. तरीही आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ आणि मोठ्या मताधिक्याने विजय मिळवू,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, यापूर्वीचा २.७० लाख मतांचा विक्रम मोडण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.


