पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात गुलियन बॅरो सिंड्रोम (जीबीएस सिंड्रोम) या आजार नियंत्रणात आहे. तरीही पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील विविध भागात पाणी तपासणी सुरू केली आहे. बहुतांश ठिकाणचे पाणी स्वच्छ असल्याचा दावाही पालिकेने केला आहे. मात्र, काही भागात दूषित पाणी असल्याचा अहवाल आहे. या दूषित पाण्याद्वारे ‘जीबीएस’ची लागण होण्याची शक्यता असल्याने महापालिकेने या भागातील पाण्याची पुन्हा तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात जीबीएस आजाराचे १७ संशयित रूग्ण आहेत. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. वाढत्या रूग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरातील पाणी तपासणीची मोहिम हाती घेतली आहे. या आजाराची प्राथमिक लक्षणे आढळलेली संशयित रूग्ण ज्या भागात वास्तव्य करतात, त्या परिसरात महापालिकेद्वारे नळामार्फत पुरविल्या जाणाऱ्या पाण्याचे नमुने तपासण्यात येत आहेत.
त्यानुसार शहरातील २३ ठिकाणचे पाण्याचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील राज्य आरोग्य प्रयोगशाळेत पाठविले होते. त्यापैकी थेरगाव, पिंपरी, काळेवाडी, अजमेरा, दिघी, ताथवडे, मोशी, भूमकर वस्ती, संत तुकारामनगर परिसरातील पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल आला आहे.
पाणी फिल्टर करून वितरित होते..
महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात पाणी निर्जंतुकीकरण केले जाते. विविध शास्त्रोक्त प्रक्रियांचे अवलंब करुनच शहरामध्ये पाणीपुरवठा केला जातो. पाणी निर्जंतुकीकरणासाठी आवश्यक असणारी टीसीएल पावडर वापरण्यात येते. नागरिकांना शुद्ध पाणी मिळण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्राकडून अत्यावश्यक प्रक्रियांचा अवलंब करण्यात येत आहे. अत्याधुनिक पद्धतीने पाच टप्यात पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया केली जाते.
क्लोरीन टाकून पाण्यातील जंतू मारले जातात. त्यानंतर पाण्यात ‘लिक्विड’ मिसळले जाते. फिल्टरने पाणी स्वच्छ केले जाते. त्यानंतर शुद्ध टाकीमध्ये पाणी सोडले जाते. या टाकीत पाणी सोडतानाच निर्जंतुकीकरण करण्यासाठी आवश्यकतेनुसार ‘लिक्विड क्लोरिन’ सोडला जातो. त्यानंतर प्रयोगशाळेत दर दहा मिनिटाला पाण्यात क्लोरिन आहे की नाही, याची तपासणी केली जाते. त्यानंतर हे जलवाहिनीव्दारे नागरिकांना वितरित केले जाते.


