पुणे : स्पर्धा परीक्षेच्या तयारीच्या तणावातून पुण्यात आणखी एका तरुणानं जीवन संपवलं. बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी २६ वर्षीय सागर पवार यानं शनिवारी (२९ नोव्हेंबर) सकाळी ८ वाजता आपल्या भाड्याच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. खोलीला आतून कुलूप लावल्याने ही बाब उशिरा समोर आली.
सागर हा गेल्या काही वर्षांपासून पुण्यात राहून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेची जोरदार तयारी करत होता. पोलिसांनी सांगितलं की, परीक्षेच्या अपयशामुळे आणि सततच्या नैराश्यातून त्यानं हे टोकाचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक संशय आहे. घटनास्थळी आतापर्यंत सुसाइड नोट सापडलेली नाही.
घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, पंचनामा करून मृतदेह शवचिकित्सेसाठी पाठवण्यात आला आहे. सागरचे कुटुंबीय बुलढाण्यातून पुण्याकडे रवाना झाले असून, ते पोहोचल्यानंतर अधिक माहिती मिळेल, असे पोलिसांनी सांगितले.
गेल्या काही महिन्यांत पुण्यात MPSC-UPSC च्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मानसिक तणाव, बेरोजगारीचा दबाव आणि अपयशाची भीती अशा कारणांमुळे अनेक तरुण टोकाचे पाऊल उचलत असल्याचं मानसोपचारतज्ज्ञ सांगतात. या घटनेनं पुन्हा एकदा स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा गंभीर प्रश्न समोर आणला आहे.


