Pune News: हिंजवडीतल्या आयटी पार्कलगत असलेल्या अंगणवाडी केंद्रात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, वीस बालकांना आत कोंडून ठेवण्यात आल्याचा आरोप समोर आला आहे. व्हिडिओत अंगणवाडीतील लहान मुलं भीतीने रडत असल्याचे दृश्य दिसताच पालकांमध्ये संतापाची लाट उसळली. हिंजवडी येथील अंगणवाडी क्रमांक ३ मध्ये कार्यरत सेविका सविता शिंदे आणि मदतनीस शिल्पा साखरे यांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचे प्राथमिक माहितीवरून समजते.
मुलांना कोंडून ठेवण्यामागील धक्कादायक कारण
ग्रामपंचायतीतील एका माजी सरपंचांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आम्ही अंगणवाडीला कुलूप लावले आणि मुलांना आतच ठेवले, अशी कबुली दोन्ही कर्मचाऱ्यांनी दिली असल्याचे समजते. हा प्रसंग बुधवारी (ता. २६) सकाळी अकरा ते बारा या वेळेत घडला. घटनास्थळी असलेल्या लोकांनी लगेच याबाबत माहिती मुळशी पंचायत समितीचे बाल विकास प्रकल्प अधिकारी धनराज गिराम यांना दिली. तत्काळ कारवाई करत गिराम यांनी शिंदे आणि साखरे या दोघींना बैठक सोडून ताबडतोब केंद्राचे कुलूप उघडण्याचे आदेश दिले.
हेही वाचा – पुणेकरांसाठी खुशखबर! खराडी ते खडकवासला आणि नळ-स्टॉप ते माणिक बाग मेट्रो मार्गाला मंजुरी
घटनेमुळे संतापाचा उद्रेक
अगदी काही वेळासाठीसुद्धा एवढ्या लहान मुलांना कुलूप लावून बंदिस्त ठेवणे किती भयावह ठरू शकते, याची जाणीव व्हिडिओतील रडण्याच्या आवाजातून स्पष्ट जाणवते. मुलांची भीती आणि अस्वस्थता पाहून पालकांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. या गंभीर दुर्लक्षाबाबत बाल विकास विभाग कोणती कार्यवाही करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
हिंजवडीत धक्कादायक प्रकार, सेविका अन मदतनीस वीस लहानग्यांना अंगवाडीत कोंडून बैठकीला गेल्या. मुलं रडत बसली. कालच्या घटनेचा व्हिडीओ एबीपी माझाच्या हाती#Punenews #hinjewadinews pic.twitter.com/g7DHcLNpGv
— Ankita Shantinath Khane (@KhaneAnkita) November 27, 2025
नेमके काय घडले?
माजी सरपंचांच्या बोलावणीवरून बैठकीसाठी निघण्यापूर्वी सेविका आणि मदतनीस यांनी वीस लहानग्यांना अंगणवाडीतच बंद करून त्याला कुलूप लावले, असा आरोप व्हिडिओ आणि साक्षीदारांच्या म्हणण्यानुसार समोर आला आहे. प्रकल्प अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर कुलूप उघडण्यात आले, मात्र या गंभीर निष्काळजीपणामुळे अंगणवाडी व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या प्रकरणानंतर पालकांमध्ये भीती आणि नाराजीचे वातावरण असून जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.


