Winter Alert : महाराष्ट्रात तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणात घसरल्याने नागरिकांना हाडं गोठवणाऱ्या थंडीचा सामना करावा लागत आहे. महिन्याच्या सुरुवातीलाच झालेल्या पावसामुळे वातावरण ढगाळ झाले असून सकाळी व रात्री गारवा, धुके आणि दव मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आजही तापमानात चढ-उतार सुरू राहणार असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात थंडीचा प्रभाव अधिक वाढला आहे.
काल परभणी येथे राज्यातील नीचांकी ६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. निफाडमध्ये ७ ते ८ अंश, धुळ्यात ७.२ अंश तर पुणे, नाशिक, जेऊर, भंडारा आणि गोंदिया येथे १० अंशांपेक्षा कमी तापमान नोंदवले गेले. आज राज्यात अंशतः ढगाळ वातावरण असून गारठा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामानशास्त्रानुसार किमान तापमान १० अंशांच्या खाली गेल्यास आणि सरासरीपेक्षा ४.५ अंशांची घट झाल्यास थंडीची लाट मानली जाते. तापमानात ६.५ अंशांहून अधिक घट झाल्यास तीव्र थंडीची लाट समजली जाते. सध्या अनेक जिल्ह्यांत तापमान झपाट्याने घसरल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यातील प्रमुख जिल्ह्यांतील किमान तापमान (अंश सेल्सिअस)
परभणी ६, निफाड ८, पुणे ९.५, नाशिक १०, जळगाव ११, छत्रपती संभाजीनगर १०.६, बीड १०.५, गोंदिया १०, नागपूर १०.६, वाशीम १०.६, अमरावती ११.५, वर्धा ११.५, यवतमाळ ११, कोल्हापूर १४.८, सोलापूर १४, अकोला १४.५.


