Pimpri-Chinchwad School: हिवाळ्याचे दिवस आणि वाढती थंडी यामुळे अंधार लवकर पडतोय. हे लक्षात घेता, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शहरातील महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. आता सर्व शाळा सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत भरणार आहेत.
वेळ बदलण्याचे मुख्य कारण
सध्या हिवाळ्याचे दिवस असल्याने सकाळी उशीरापर्यंत थंडी असते आणि संध्याकाळी लवकर अंधार पडतो. दुपारी 5:30 वाजता शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी परतताना अंधार पडतो. यामुळे पालकांकडून चिंता व्यक्त केली जात होती. विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि आरोग्य विचारात घेऊन प्रशासनाने वेळेत कपात व बदल करण्याचा तोडगा प्रशासनाने काढला आहे.
विद्यार्थ्यांना होणारे फायदे
सकाळच्या कडाक्याच्या थंडीत लवकर बाहेर पडावे लागणार नसल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारे परिणाम टाळता येतील.
सायंकाळी लवकर शाळा सुटल्यामुळे विद्यार्थी अंधार पडण्यापूर्वी सुरक्षितपणे घरी पोहोचू शकतील.
वेळेतील या बदलामुळे विद्यार्थ्यांना पुरेशी विश्रांती मिळेल, परिणामी वर्गातील उपस्थिती वाढून शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा होण्यास मदत होईल.
विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे पालकांची चिंता मिटली असून, मुलांनाही अभ्यासासाठी आणि विश्रांतीसाठी पुरेसा वेळ ही मिळणार आहे.
शिक्षण विभागाच्या शिक्षक आणि मुख्याध्यापकांना सूचना
शाळेची वेळ बदलल्यानंतर वेळेआधीच शिक्षक आणि मुख्याध्यापकांना शाळेत हजर राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. शिक्षक व मुख्याध्यापकांनी अनियमितता दाखवण्यास त्यांच्यावर कारवाई सुद्धा होणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.


