Pune Crime : पुण्यातील कात्रज बोगदा परिसरात अनैतिक संबंधातून एका 25 वर्षीय महिलेचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोरीने गळा आवळून तिची हत्या करण्यात आली असून आंबेगाव पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
मृत महिलेचे नाव मनीषा खम्म दमाई (वय 25) असून ती नऱ्हे परिसरात राहत होती. या प्रकरणी प्रकाश अर्जुन तिखात्री (वय 30) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत मनीषाचा भाऊ किशन परिहार यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि मृत महिला हे दोघेही मूळचे नेपाळचे रहिवासी असून पुण्यात रखवालदाराचे काम करत होते. ते एकमेकांचे नातेवाईक असून दोघांमध्ये अनैतिक संबंध होते. मात्र, काही काळानंतर आरोपीला हे संबंध संपवायचे होते, तर महिला त्याला विरोध करत होती. यावरून दोघांमध्ये सतत वाद होत होते.
या वादातूनच 18 मार्च रोजी आरोपीने मनीषाला भिलारवाडी येथील जंगलात नेले आणि दोरीने गळा आवळून तिचा खून केला. त्यानंतर ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती.
तपासादरम्यान पोलिसांना आरोपीवर संशय आला. त्याला ताब्यात घेतल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून मृतदेहाची ओळख नातेवाईकांनी पटवली. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.


