Sandeep Joshi Retirement: सत्तेची चढाओढ, फोडाफोडीचे राजकारण आणि निष्ठावंतांची होणारी घुसमट यावर जाहीर नाराजी व्यक्त करत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार संदीप जोशी यांनी राजकीय संन्यासाची घोषणा केली आहे. “आता मला थांबायचंय…” या मथळ्याखाली लिहिलेल्या एका भावूक पत्राद्वारे त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून, या निर्णयाने राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
संदीप जोशी यांनी आपल्या पत्रात सध्याच्या राजकीय परिस्थितीवर थेट बोट ठेवले असून सत्तेसाठी सुरू असलेले पक्षांतर आणि वाढलेली स्पर्धा सामान्य कार्यकर्त्यांना अस्वस्थ करणारी असल्याचे म्हटले आहे. स्वतःचे वय 55 वर्षे झाल्याचे सांगत, नवीन पिढीला संधी देण्यासाठी ज्येष्ठांनी बाजूला होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. पक्षाने आपल्याला खूप काही दिले, पण आता स्वतःच्या अस्तित्वासाठी धडपड करण्यापेक्षा सन्मानाने निवृत्त होणे त्यांनी पसंत केले आहे.
जोशी यांच्या आमदारकीची मुदत 13 मे रोजी संपत असून, त्यानंतर त्यांनी पुन्हा विधान परिषदेवर न जाण्याचा निश्चय केला आहे. पक्षाने पुन्हा विचार केला तरी आपण नम्रपणे नकार देऊ आणि ही जागा एखाद्या सामान्य तरुण कार्यकर्त्याला मिळावी, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली आहे. आपल्या राजकीय प्रवासात खंबीर साथ देणाऱ्या नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांची त्यांनी यावेळी माफीही मागितली आहे.
मात्र, निवृत्तीचा अर्थ घरी बसणे असा नसल्याचेही जोशी यांनी स्पष्ट केले असून राजकारण सोडले तरी त्यांचे सामाजिक प्रकल्प अधिक वेगाने सुरू राहतील. यामध्ये ‘दीनदयाल थाळी’ या उपक्रमाद्वारे गरजूंना अल्पदरात भोजन पुरवणे आणि ‘सोबत पालकत्व’ मोहिमेद्वारे कोरोना काळात अनाथ झालेल्या मुलांसाठीचे कार्य ते सुरूच ठेवणार आहेत. याशिवाय गोसेवा, आरोग्य शिबिरे आणि क्रीडा संघटनांमधील सक्रिय सहभागही कायम राहणार आहे. पत्राच्या शेवटी त्यांनी “कुर्सी नहीं, क़ीमत बचाने चला हूँ” ही ओळ वापरून स्वतःच्या तत्त्वांशी तडजोड करणार नसल्याचा इशारा दिला आहे. स्वतःला न्याय देण्यासाठी घेतलेला हा निर्णय मनाला शांती देणारा आहे, असे सांगत त्यांनी आपल्या सक्रिय राजकीय प्रवासाला पूर्णविराम दिला आहे.


