Ajit Pawar Plane Crash : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आता नवनवीन खुलासे समोर येत असून या प्रकरणाला वेगळे वळण मिळताना दिसत आहे. आमदार अमोल मिटकरी यांनी घटनास्थळावरील सरपंचांच्या हवाल्याने एक खळबळजनक दावा केला आहे. विमान कोसळत असताना त्यातून एक व्यक्ती बाहेर पडण्यासाठी जीवाच्या आकांताने धडपड करत होती, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. या दाव्यामुळे हा केवळ अपघात होता की घातपात, यावर आता राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
मिटकरींचा सवाल; सहावा देह कुठे गायब झाला?
या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत नोंद असली तरी, अमोल मिटकरी यांनी तांत्रिक विसंगतीवर बोट ठेवले आहे. “डीजीसीए (DGCA) च्या माहितीनुसार विमानात सहा जण प्रवास करत होते, मग घटनास्थळी केवळ पाचच मृतदेह कसे सापडले? तो सहावा व्यक्ती नेमका कोण होता आणि तो कुठे गायब झाला?” असा जळजळीत प्रश्न मिटकरींनी उपस्थित केला आहे. विमान कोसळण्यापूर्वी त्यातून कुणी उडी मारली होती का? याची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
प्रत्यक्षदर्शी सरपंचांचा थरारक अनुभव
गोजुबावीचे सरपंच कल्याण आटोळे यांनी हा अपघात डोळ्यांनी पाहिला असून त्यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन सविस्तर माहिती दिली. आटोळे यांच्या म्हणण्यानुसार, अपघात होण्यापूर्वी विमानाने आकाशात दोन गिरक्या घेतल्या होत्या. “आम्ही जेव्हा विमानाकडे धावलो, तेव्हा त्याचा दरवाजा उघडा होता आणि निळी पँट घातलेला एक व्यक्ती बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, आम्ही तिथे पोहोचेपर्यंत विमानाचा भीषण स्फोट झाला,” असे सरपंचांनी सांगितले. सुरुवातीला हे विमान एखाद्या उद्योगपतीचे असावे असे ग्रामस्थांना वाटले होते, मात्र नंतर अजित पवारांच्या निधनाची बातमी समजताच परिसरात शोककळा पसरली.
अजित पवारांच्या मृत्यूबाबत केवळ त्यांचे निकटवर्तीयच नव्हे, तर सर्वसामान्य जनतेतूनही संशय व्यक्त केला जात आहे. या अपघातामागे काही षडयंत्र तर नाही ना? या दृष्टीने आता केंद्रीय तपास यंत्रणांनी तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत. राज्य आणि केंद्र स्तरावर या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू झाली आहे.


